मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ आरोपावर विधानसभा अध्यक्षांचं उत्तर काय?; विरोधकांचा खरोखर दबाव होता?

आमदार पात्रतेचा निकाल देताना राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र असल्याचा निकाल दिला. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांवर काय दबाव होता हे आम्ही पाहू असं म्हणाले होते. नार्वेकरांवर विरोधकांचा खरंच दबाव होता याबाबत त्यांनी स्वत: खुलासा केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या त्या आरोपावर विधानसभा अध्यक्षांचं उत्तर काय?; विरोधकांचा खरोखर दबाव होता?
Harish Malusare | Updated on: Jan 11, 2024 | 9:21 PM

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवर दिलेल्या निकालाची देशभरात चर्चा आहे. मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असून दोन्ही गटातील आमदार हे पात्र असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला होता. ठाकरे गटाचे आमदारांना पात्र करण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकर यांच्यावर दबाव होता का हे पाहू असं म्हटलं होतं. यावर स्वत: राहुल नार्वेकर यांनी टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राहुल नार्वेकर?

एकनाथ शिंदेंचा पण रोष आमच्यावर आणि ठाकरेंचा रोषही आमच्यावर आहे. रोषाला घाबरून आम्ही निर्णय देत नाही. आम्ही संविधानाच्या निर्णयानुसार निर्णय घेतो. कायद्यात अपात्रतेसंबंधित तरतुदी आहे त्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्या गाईडलाईन दिल्या त्यानुसार आम्ही निर्णय देतो. त्यामुळे कुणाला वाईट वाटतं कुणाला काय वाटतं. त्याच्याशी आमचा संबंध नाही. आम्हाला कायद्याला पुढे न्यायचं आहे. सामान्य लोकांचा संसंदीय लोकशाहीवरचा विश्वास वाढावा हे काम करायचं असल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले.

माझ्यावर आरोप करण्यात आला की मी वेळकाढूपणा करतोय. नंतर म्हणाले तुम्ही अॅप्लिकेशन अलाऊ का करता. तुम्ही एक्स यांना भेटला. त्यांना भेटला. हे सर्व दबाव टाकण्याचे प्रयत्न आहे. मी दिलेला निर्णय सुस्पष्टता आहे. तुम्ही केवळ आरोप करण्यापेक्षा माझ्या निर्णयात काय नियमबाह्य आहे, काय घटनाबाह्य आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाचं कुठं उल्लंघन झालं हे दाखवून देणं अधिक योग्य राहिल. आरोप कोणीही करतं, आरोप करणं अवघड असतं. जे आरोप केले गेले आहेत, जे मुद्दे आहेत त्याला कायदेशीर बॅकिंग असल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं.

गोगावले प्रतोद नसते तर तुमची नेमणूक झाली नसती या प्रश्नावर नार्वेकर काय म्हणाले?

चुकीचा समज आहे. अध्यक्षांची नेमणूक सभागृह करतं. सभागृहाच्या संख्याबळावर अध्यक्ष नियुक्त होतो. मला जी मते पडली ती 167 मते आहेत. त्यातून तुम्ही शिंदे गटाची मते कमी केली तरी अध्यक्ष म्हणून मी या पोस्टवर योग्यरित्या नियुक्त झालो आहे हे सिद्ध होतं. विधीमंडळात आज झालेली घटना, उद्या जर ती घटना घडल्यावर सरकार कोसळलं तर सरकारने घेतलेले निर्णय आणि विधीमंडळात झालेले कायदे आपण रद्द करतो का. त्यामुळे पूर्वलक्षी प्रभाव नसतो. ज्या दिवशी अपात्र ठरतात त्या दिवसापासून पुढे इफेक्ट होतो. त्यामुळे तुम्ही अध्यक्ष झाला म्हणून ते पात्र हे जोडणं चुकीचं असल्याचं नार्वेकर म्हणाले.

Follow Us