आदित्य ठाकरे यांच्या वरळीत संदीप देशपांडेंच्या फेऱ्या वाढल्या, राज ठाकरेंचा मोठा निर्णय, विधानसभा मतदारसंघासाठी…

| Updated on: Apr 22, 2023 | 1:21 PM

भाजप, शिंदेंची शिवसेना, मनसे असे सगळेच एकत्र आले तर वरळीतून आदित्य ठाकरे यांना निवडणूकीसाठी मोठं आव्हान उभं राहू शकतं.

आदित्य ठाकरे यांच्या वरळीत संदीप देशपांडेंच्या फेऱ्या वाढल्या, राज ठाकरेंचा मोठा निर्णय, विधानसभा मतदारसंघासाठी...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात एकिकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपवर (BJP) राजकीय वर्तुळाची करडी नजर आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि इतर पक्षांच्या प्रत्येक रणनीतीकडे मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अनुशंगाने वरळी विधानसभा मतदार संघ सर्वात महत्त्वाचा मानला जातो. उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आमदार असलेला हा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी विविध पक्षांनी रणनीती आखली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपतर्फे वरळीत विशेष कार्यक्रम, उपक्रमांचं आयोजन केलं जातंय, तर मनसेच्या गोटातील हालचालीदेखील वाढल्या आहेत. आदित्य ठाकरेंविरोधात वरळीतून मनसे नेते संदीप देशपांडे उभे राहणार असल्याची चर्चा आहे. आता राज ठाकरे यांच्या एका निर्णयामुळे संदीप देशपांडे यांचा दावा आणखी भक्कम होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

राज ठाकरे यांचा निर्णय काय?

संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांची मनसेच्या वरळी विभाग अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी नुकतीच धुरी यांची या पदासाठी नियुक्ती झाल्याची घोषणा केली. संजय जामदार यांना विभागअध्यक्ष पदावरून डच्चू देण्यात आलाय. गेल्या काही दिवासांपासून संदीप देशपांडे यांच्या वरळीतील फेऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे संदीप देशपांडे यांनी वरळीतून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली असल्याचं म्हटलं जातंय. येथील मतदारांच्या समस्या ते जाणून घेत आहेत.

आदित्य ठाकरेंविरोधात भाजप की मनसे?

वरळी विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये आदित्य ठाकरे विजयी झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. यंदा आदित्य ठाकरे यांना वरळीतच पराभूत करण्याचा डाव भाजप-शिंदे सेनेचा आहे. त्यातच मनसे आणि भाजप युतीचे संकेत मिळत आहेत. भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांनीदेखील गेल्या वर्षभरापासून वरळीकडे सर्वाधिक लक्ष दिलंय. त्यामुळे वरळीवर भाजप तगडा उमेदवार देणार, असं बोललं जातंय. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनीदेखील बीडीडी चाळीसह इतर भागांमध्ये स्वतः दौरे सुरु केले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंविरोधात मनसेकडून देशपांडे उभे राहणार या शक्यतांना एकानंतर एक घटनांनी बळ मिळतंय. तर भाजपच्या रणनीतीत आणखी काय काय नियोजित केलं गेलंय, याचीही उत्सुकता ताणली गेली आहे. एकूणच, भाजप, शिंदेंची शिवसेना, मनसे असे सगळेच एकत्र आले तर वरळीतून आदित्य ठाकरे यांना निवडणूकीसाठी मोठं आव्हान उभं राहू शकतं.