शिवसेनेत फुट पडल्याची तक्रार विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचलीच नाही? राहुल नार्वेकर यांचं मोठं वक्तव्य

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज शेवटची सुनावणी पार पडली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. विशेष म्हणजे आजच्या सुनावणीदरम्यान विधानसभा अध्यक्षांनी एक मोठं वक्तव्य केलं. त्यामुळे येत्या 10 जानेवारीला येणारा निकाल कसा असेल? याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

शिवसेनेत फुट पडल्याची तक्रार विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचलीच नाही? राहुल नार्वेकर यांचं मोठं वक्तव्य
Chetan Patil | Updated on: Dec 20, 2023 | 8:19 PM

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, नागपूर | 20 डिसेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज अखेर अंतिम सुनावणी पार पडली. शिवसेना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आज अंतिम युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या वकिलांनी मांडलेला मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे आमदार अपात्रतेच्या आजच्या सुनावणीदरम्यान विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक मोठं वक्तव्य केलं. “माझ्याकडे अजूनपर्यंत शिवसेना पक्षात फूट पडण्याची कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. अन्यथा मी पक्षविरोधी कायदा किंवा शेड्युल्ड 10 नुसार कारवाई केली असती”, असं मोठं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी सुनावणी दरम्यान केलं.

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर गेल्या दोन महिन्यांपासून सलग सुनावणी सुरु होती. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकून घेतला. तसेच विधानसभा अध्यक्षांसमोर दोन्ही गटाच्या आमदारांची फेरसाक्ष नोंदवण्यात आली. दोन्ही गटांचा युक्तिवाद आता पूर्णपणे संपला आहे. या प्रकरणाची आज शेवटची सुनावणी पार पडली. त्यानंतर 10 जानेवारीला निकाल समोर येईल. पण सुनावणीच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांनी पक्षात फूट पडल्याची तक्रार न आल्याने आपण पक्षविरोधी कायदा किंवा शेड्युल्ड 10 नुसार कारवाई केली नाही, असं वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राहुल नार्वेकर पक्षविरोधी कायदा आणि शेड्युल्ड 10 वर आणखी काय म्हणाले?

विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी संपल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पक्षविरोधी कायदा आणि शेड्युल्ड 10 वर भूमिका मांडली. “पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे यात अनेक वेळा संशोधन करून सुधारणा झालेले आहेत. प्रत्येक वेळी सुधारणा झाल्यानंतर हा कायदा अधिक बळकट आणि अधिक सक्षम झाला आहे. सर्वोच्च न्यायालय असो किंवा उच्च न्यायालय या कायद्यातील अनेक तरतुदींचं वाचन हे वेगवेगळ्या पद्धतीने केलं गेलं”. अशी भूमिका विधानसभा अध्यक्षांनी मांडली.

“या प्रकरणातील याचिकांचे वेगवेगळ्या राज्यात आणि विधीमंडळात घेतलेल्या निर्णयामुळे त्यातून नवीन कायदा ही निर्माण झाला. महाराष्ट्रातही आज तशीच वेगळी परिस्थिती आहे. अशी परिस्थिती इतर राज्यात कधीही निर्माण झालेली नव्हती. या अपात्रतेच्या प्रकरणात सर्व कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करून, आणि सगळ्या मुद्द्यांचा विचार करून आपण योग्य निर्णय घेऊ. जेणेकरून हा निर्णय राज्यातील पक्षांतर बंदी कायद्यासाठी एक दाखला ठरेल”, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्षांनी दिली.

शेवटच्या दिवशी महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद काय?

सुनावणीच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाचे नेते महेश जेठमलानी महत्त्वाचा युक्तिवाद केला. “शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षाचे कामकाज 7 कर्मचारी पाहतात. त्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी ही विजय जोशी या कार्यालय सचिवांवर आहे. २२ जूनच्या व्हीपबाबत जोशी यांनी दिलेली साक्ष महत्त्वाची आहे. सुनील प्रभू म्हणतात व्हीप हा सचिव जोशींकडून देण्यात आला. सचिव जोशी म्हणतात कार्यालयातील शिपायांकडून हा व्हीप बजावण्यात आला. आमदारांना व्हीप मिळालाच नाही. त्याचे पुरावे त्यांना सादर करता आले नाहीत”, असा युक्तिवाद महेठ जेठमलानी यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us