Nagpur beggars : नागपूरची भिकारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल; देशभरातील 10 शहरांमध्ये निवड

| Updated on: Apr 27, 2022 | 1:21 PM

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधून (Nagpur) एक अभिमानास्पद बातमी. होय, आपल्या या शहराची आता भिकारीमुक्त शहराच्या दिशेने वाटचाल सुरू झालीय. केंद्र सरकारच्या भिकारीमुक्त शहर योजनेत देशभरात 10 शहरांची निवड करण्यात आलीय. विशेष म्हणजे त्यातही नागपूर शहराचा समावेश आहे.

Nagpur beggars : नागपूरची भिकारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल; देशभरातील 10 शहरांमध्ये निवड
महापालिका, नागपूर.
Follow us on

नागपूरः महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधून (Nagpur) एक अभिमानास्पद बातमी. होय, आपल्या या शहराची आता भिकारीमुक्त शहराच्या दिशेने वाटचाल सुरू झालीय. केंद्र सरकारच्या भिकारीमुक्त शहर योजनेत देशभरात 10 शहरांची निवड करण्यात आलीय. विशेष म्हणजे त्यातही नागपूर शहराचा समावेश आहे. या योजनेतून भिकाऱ्यांसाठी (beggars) नागपुरात आजपासून निवारागृह सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात 150 भिकाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात येणार आहे. या निवारागृहात भिकाऱ्यांना अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येतेय. त्यासोबतच भिकारी आपल्या पायावर उभे रहावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेडून (Municipal Corporation) विविध योजना राबवण्यात येत आहेत. नागपूरसह राज्यातील अनेक शहरात भिकाऱ्यांची मोठी संख्या आहे. नागपूरात सध्या 1600 पेक्षा तास्त भिकारी आहेत. या भिकाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणता यावे, यासाठी केंद्र सरकारने भिकारीमुक्त शहराची योजना सुरू केलीय. याच योजनेतून नागपूरात आजपासून भिकाऱ्यांसाठी निवारागृह सुरू केले आहे.

राज्यात एप्रिलमध्ये अंमलबजावणी

मराठी नववर्षाच्या निमित्ताने राज्य सरकारनेही भिकारीमुक्त शहर अभियान सुरू केले आहे. त्याची घोषणा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली होती. विविध शहरात भीक मागणाऱ्या बालकांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांना डे केअर सेंटर अथवा अन्य शाळांमध्ये नाव नोंदवून सक्तीने शिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्येही शहर भिकारीमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला. मात्र, तिथे हा प्रयोग फसल्याचे समोर आले.

देशात किती भिकारी आहेत?

सामाजिक न्यायमंत्री थावर चंद गेहलोत यांनी 2018 मध्ये भारतातल्या भिकाऱ्यांची यादी लोकसभेत जाहीर केली होती. या माहितीनुसार देशात 4 लाख 13 हजार 760 भिकारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी 2011 मधली आहे. त्यानुसार मिझोराम राज्यात सर्वात कमी भिकाऱ्यांची संख्या आहे. मिझोरामध्ये 53 भिकारी आहेत. तर लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दिव दमण या केंद्रशासित प्रदेशात अनुक्रमे 2, 19 आणि 22 भिकारी आहेत. सर्वाधिक भिकारी असणाऱ्यांमध्ये पश्चिम बंगाल पहिल्या जागी आहे. तिथे 81 हजार 244 भिकारी आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उत्तर प्रदेशात 65 हजार 835 भिकारी आहेत.