आधी बंडखोरी आता उद्धव ठाकरेंसाठी सदिच्छा, ओमराजेंच्या नव्या पोस्टमुळे चर्चेला उधाण; काय म्हणाले?
ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांचा सोशल मीडियावर टीकाचे सामना करावा लागला. त्यांचे एकूण 30 हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये झालेली ही घट आणि त्यावरून सुरू झालेली चर्चा राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरत आहे.

Omraje Nimbalkar And Uddhav Thackeray : ठाकरे यांच्या पक्षाच्या एकूण सहा खासदारांनी बंड करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंच्या बंडखोर गटाच्या शिवसेनेतील विलिनीकरणास आता लोकसभा सचिवालयानेही परवानगी दिलेली आहे. शिंदे गटात प्रवेश करताच आता बंडखोर खासदार हे ठाकरे यांच्या पक्षावर टीका करत आहेत. याच बंडखोर खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश आहे. त्यांनी मी शिंदे गटात जाणार असलो तरी भविष्यात कधीच ठाकरे कुटुंबावर टीका करणार नाही, असे तेव्हाच स्पष्ट केलेले आहे. असे असतानाच आता ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया पोस्टची सगळीकडे चर्चा आहे. त्यांच्या या पोस्टवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.
ओमराजे यांच्या पोस्टवर कमेंट्स काय आल्या?
ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, या सदिच्छा,’ असं ओमराजे आपल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले आहेत. परंतु ओमराजे यांच्या या पोस्टवर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. लोकांनी ओमराजे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला आहे. निंबाळकर यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. नेटकऱ्यांनी “तुम्ही खाल्ल्या मिठाला जागले नाही”, “2029 ला तुम्ही कायम घरी जाणार आहात”, “तुम्ही शुभेच्छा देण्याचा अधिकार गमावला आहे”, अशा स्वरूपाच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दुसरीकडे ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांचा सोशल मीडियावर टीकाचे सामना करावा लागला. त्यांचे एकूण 30 हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये झालेली ही घट आणि त्यावरून सुरू झालेली चर्चा राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरत आहे.
मा. उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, या सदिच्छा.@uddhavthackeray pic.twitter.com/xrFTJPhrma
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) July 27, 2026
ठाकरे गट सोडताना ओमराजे काय म्हणाले होते?
ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी केली तेव्हा सर्वाधिक चर्चा ही ओमराजे निंबाळकर यांचीच झाली. ओमराजे यांच्या वडिलांच्या हत्त्येच्या खटल्याचा निकाल आला होता. विरोधात निकाल गेल्यानंतर त्यांनी मी माझ्या कार्यकर्त्यांशी अगोदर संवाद साधेन, त्यानंतरच शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करेन, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे ओमराजे काय निर्णय घेणार, याची सगळीकडेच चर्चा सुरू होती. पण नंतर कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतल्यानंतर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावेळीच मी कधीच ठाकरे कुटुंबावर टीका करणार नाही, असेही त्यांनी सांगून टाकले होते.
