कोण किती जागा लढवणार हे…; विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
Vijay Vadettiwar on loksabha Election 2024 : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावरही भाष्य केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत वडेट्टीवार यांनी नेमकं काय म्हटलंय? निवडणुकीवर विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
सुनील ढगे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी | 22 डिसेंबर 2023 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहेत. अशातच कोणता पक्ष किती जागा लढवणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाचं जागावाटप यावरही विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. जागावाटप हा केंद्रीय पातळीवरचा विषय आहे. अजून चर्चेची पहिली फेरी देखील झालेली नाही. मग जागा वाटपाचा विषय आला कुठून? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे.
राऊतांच्या विधानावर म्हणाले…
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी जागावाटपावर प्रतिक्रिया दिली. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक होईल त्यातून जागावाटप ठरेल, असा दावा संजय राऊत यांनी केला. यावर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यांचं केंद्रीय नेतृत्वाशी काय बोलणं झालं आहे हे आम्हा राज्यातील नेत्यांना माहित नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. जेव्हा आम्ही बसू तेव्हा बोलू, असं ते म्हणाले.
अजून चर्चेची पहिली फेरी झालेली ही नाही. तरी अशा वावड्या उठत आहेत. जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार केंद्रीय समितीला आहे. राज्यातील नेत्यांना नाही. संजय राऊत 23 जागा लढवणार असे म्हणाले. मात्र त्यांच्या वक्तव्याचा खंडण आम्ही का करायचं? किती जागा काँग्रेस लढेल याचा निर्णय आमचं हाय कमांड करेल, असंही वडेट्टीवार म्हणाले.
सरकारवर टीका
राज्याच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे. राज्याच्या तिजोरीतून 134% खर्च झालाय. नुसतं निविदा काढण्याचं काम सुरू आहे. अधिकारी निवडणुकीसाठी निधी गोळा करण्याचे काम करत आहे. कंत्राटदारांचे पैसे थकले आहे, असं म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय.
आरक्षणावर वडेट्टीवार म्हणाले…
मराठा आरक्षणाचा वाद महायुतीचे सरकारने निर्माण केला आहे. सरकारने जरांगेना आश्वासन द्यायचं नव्हतं? का शिष्टमंडळ घेऊन भेटायला गेले.. आता जेव्हा भेटले आहात तर शब्द पूर्ण करा.. हा पाप महाराष्ट्र सरकारचा आहे त्यामुळे त्याचा प्रायश्चित करावा लागणार आहे.. या अधिवेशनातून अपेक्षा होती.. मात्र कुठलाच निर्णय झालेला नाही.. याचाच अर्थ आहे की सरकार निर्णय घेऊ शकत नाही आणि जेव्हा निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा का आश्वासन देता, असं वडेट्टीवार म्हणालेत.