“बोम्मई मुंबई तर लांब राहिली, तुम्ही कोल्हापूरचंही नाव घेऊ नका” ; सरकारच्यावतीनं प्रतोदांनी कर्नाटक सरकारचे कान टोचले

| Updated on: Dec 28, 2022 | 6:15 PM

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला करत मुंबईसाठी किती हुतात्मे झाले ते बोम्मईला काय फोम्मईला आम्ही दाखवून देऊ असा मराठी बाणा दाखवून देत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना सुनावलं आहे.

बोम्मई मुंबई तर लांब राहिली, तुम्ही कोल्हापूरचंही नाव घेऊ नका ; सरकारच्यावतीनं प्रतोदांनी कर्नाटक सरकारचे कान टोचले
Follow us on

नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीपासूनच सीमावादावर जोरदार हंगामा सुरू झाला होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी 24 नोव्हेंबर रोजी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा केला आणि सीमावादावर पुन्हा एकदा ठिणगी पडली. त्यानंतर दोन्ही राज्यात त्याचे पडसाद उमटल्याचेही दिसून आले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्य थांबवली नसतानाच आता त्यांच्याच उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईवर दावा करून मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी त्यानी केली आहे.

त्यानंतर महाराष्ट्रातील विरोधी गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ, आमदार एकनाथ खडसे यांनी कर्नाटकवर जोरदार हल्लाबोल केला होता.

त्यानंतर आता शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी केली आहे.

त्यावर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला करत मुंबईसाठी किती हुतात्मे झाले ते बोम्मईला काय फोम्मईला आम्ही दाखवून देऊ असा मराठी बाणा दाखवून देत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना सुनावलं आहे.

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी कर्नाटक सरकारवर टीका करताना त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबई तर लांब राहिली आहे, तुम्ही बेळगावजवळ असलेल्या कोल्हापूरचंही नाव घेऊ नका असा सज्जड दमही त्यांना भरला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारवर आता विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे.

यावेळी भरत गोगावले यांनी सांगितले की, मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे मात्र या मुंबईत सर्व भाषीक, सर्व धर्मीय लोकं राहतात. त्यामुळे मुंबई ही काय कुणाच्या एका बापाची ही मुंबई नाही.

ज्या बसवराज बोम्मई यांनी मुंबईसाठी वक्तव्य केली आहे. त्यांना आम्ही ज्या 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या वारसांना आणि सीमाभागातील हुतात्म्यांना आमच्या सरकारकडून काही मदत देता येते का त्यावर सध्या बोलणे चालू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे सीमावाद हा सध्या न्यायालयात आहे. त्यामुळे बसवराज बोम्मई यांनी जास्त आगाऊपणा न करता शांत राहावे असा सज्जड दमही त्यांनी बोम्मई यांना दिला आहे.