Nitin Raut: नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला; नितीन राऊत म्हणतात, निश्चितच सत्यता असेल

| Updated on: May 13, 2022 | 7:54 PM

Nitin Raut: राजकारणात एक जण बोलतो आणि दुसरा त्याच्यावर कमेंट करतो. याच्यात गुंतून राहण्यापेक्षा बेरोजगारी आणि महागाईवर का बोलत नाही?

Nitin Raut: नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला; नितीन राऊत म्हणतात, निश्चितच सत्यता असेल
नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला; नितीन राऊत म्हणतात, निश्चितच सत्यता असेल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव: पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने (ncp) पाठीत खंजीर खुपसल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला आहे. नाना पटोलेंच्या या दाव्याचं राज्याचे ऊर्जा मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी समर्थन केलं आहे. राष्ट्रवादी खंजीर खुपसत आहे. यात निश्चितच सत्यता असेल, असं नितीन राऊत (Nitin Raut) यांनी म्हटलं आहे. राऊत हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान जामनेर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलेल्या भावनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले आमचे प्रांताध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या पाठीत खंजीर खुपसत आहे, असं ते बोलले असतील तर त्यात सत्यता निश्चितच असेल, त्यामुळेच त्यांनी त्यावर भाष्य केलंय. त्यांनी केलेले भाष्य खरं असू शकतं, असं म्हणत नितीन राऊत यांनी राष्ट्रवादीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

राजकारणात एक जण बोलतो आणि दुसरा त्याच्यावर कमेंट करतो. याच्यात गुंतून राहण्यापेक्षा बेरोजगारी आणि महागाईवर का बोलत नाही? माध्यमेपण त्यावर प्रश्न विचारत नाहीत. कुठेतरी काँग्रेस पक्षाची जी नाराजी आहे, ती व्यक्त करण्याची भावना प्रांताध्यक्ष यांनी त्याठिकाणी व्यक्त केली आहे. काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून मी त्याचा सन्मानच करणार आहे, असे राऊत यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

पटोले काय म्हणाले होते?

राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे काम करू नये. भंडारा असो अथवा भिवंडी असो, राष्ट्रवादीने निवडणुकांमध्ये उमेदवार देखील उभे केले. पण मैत्रीपूर्ण संबंध असताना अशा पद्धतीची कृत्य करू नये. राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही सोबत नको असेल तर त्यांनी स्पष्ट करावं. राष्ट्रवादी काँग्रेस या आधीही भाजपसोबत गेली होती पहाटेच्या वेळी त्यांनी शपथ विधी घेतला होता. समन्वय समिती समोर देखील आम्ही आमचं म्हणणं मांडलेल आहे. महाविकासआघाडी टिकवायची असेल तर चर्चा करून मार्ग काढायला हवा. आमच्या पक्षश्रेष्ठींशी आम्ही याबाबत चर्चा देखील करणार आहोत, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

आघाडीला धोका नाही

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सारवासारव केली. भंडाऱ्यात स्थानिक परिस्थितीनुसार आम्ही जमून घ्यायचा प्रयत्न केला. पण स्थानिक परिस्थिती लक्षात घेता ते जमू शकलं नाही आणि त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची त्याठिकाणी आघाडी होऊ शकली नाही. स्थानिक राजकारण वेगळं असतं. महाविकास आघाडीला कुठलाही धोका निर्माण व्हावा असे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही. राष्ट्रवादी हा पक्ष फक्त भाजप विरोधात लढत आहे आणि त्यामुळे भाजपबरोबर जाण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. शरद पवार साहेबांनी भूमिका घेतली आहे की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी जिथे जमेल तिथे एकत्र येऊन भाजपला दूर ठेवावं. तरीसुद्धा काही जर गोष्टी घडले असेल त्या बाबत माहिती बोलता येईल, असं जयंत पाटील म्हणाले.

नाना अजून सवय गेली नाही का?

नाना अजून सवय झाली नाही काय खंजीर खुपसून घ्यायची? स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय राजीव गांधी आणि सोनियाजी घायाळ झालेले आहेत. काकांच्या(शरद पवारांच्या) खंजीरांनी गोड मानून घ्या, सत्तेच्या तुकड्यासाठी, अशी खोचक टीका भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी केली आहे.