अशोक खरात महिलांना जाळ्यात कसं अडकवायचा? भोंदूबाबाचा मोठा खुलासा, म्हणाला मी त्यांना…
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याने पोलीस कोठडीत धक्कादायक कबुली दिली आहे. विज्ञानातील प्रयोगांची मोडतोड करून आणि लोकांच्या भीतीचा वापर करून त्याने महिलांची कशी फसवणूक केली, याची माहिती उघड झाली आहे.

दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए…; हे तुम्हाला एखाद्या चित्रपटातील डायलॉग वाटू शकतात. मात्र नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याने पोलीस चौकशीत याच वाक्याचा वापर करत आपल्या कृत्याचे समर्थन केल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात या प्रकरणाने आता एक वेगळे वळण घेतले आहे. यावेळी त्याने केवळ अंधश्रद्धाच नव्हे, तर विज्ञानातील प्रयोगांची मोडतोड करून लोकांच्या भीतीचा व्यापार कसा केला जातो, याची कबुली दिली आहे.
नेमके प्रकरण काय?
भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर अनेक महिलांनी फसवणुकीचे आणि लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते. तो स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असलेला व्यक्ती म्हणवून घेत असे. मात्र पोलिसांच्या कचाट्यात सापडल्यानंतर त्याने या सर्व कृत्यांची कबुली दिली आहे. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. यावेळी अशोक खरातने चमत्कार करून नव्हे तर हातचलाखी करत महिलांना धमकावल्याची कबूल केले आहे.
अशोक खरातने चौकशी दरम्यान कबूल केले आहे की तो कोणतेही चमत्कार करत नव्हता. उलट विज्ञानातील साध्या ट्रिक आणि हातचलाखीचा वापर करून तो लोकांना गंडवत होता. तसेच महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो प्रथम त्यांच्या मनात भीती निर्माण करायचा. यानंतर समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या समस्या ओळखून, त्यांना हवे तेच उत्तर देऊन तो त्यांचा विश्वास संपादन करायचा. यासोबतच लिंबातून रक्त काढणे, अग्नी प्रज्वलित करणे यांसारख्या विज्ञानावर आधारित हातचलाखीच्या गोष्टींना त्याने दैवी शक्ती असल्याचे भासवले.
तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असे धक्कादायक विधान चौकशीदरम्यान वापरले. मी लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला होता. लोकांना चमत्काराची हौस असते. मी फक्त त्यांना तेच दाखवले. मी महिलांना धमकावण्यासाठी कोणत्याही मंत्रतंत्राचा वापर केला नाही. मी त्यांच्या वैयक्तिक माहितीचा आणि भीतीचा वापर केला, असे अशोक खरातने मान्य केले आहे. त्याच्या या उत्तरांमुळे पोलीसही अवाक झाले आहेत.
दरम्यान अशोक खरातच्या या कबुलीमुळे समाजातील सुशिक्षित वर्गाच्या मानसिकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विज्ञानाचा वापर फसवणुकीसाठी करणाऱ्या अशा भोंदूबाबाने आणखी किती जणांना लुबाडले आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तसेच या प्रकरणातील पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणात खरातचे साहित्य जप्त केले आहे. त्यात अनेक रासायनिक पदार्थ आणि विज्ञानाच्या खेळाशी संबंधित वस्तू सापडल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायद्यानुसार त्याच्यावर कडक कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.