Nashik | झोपडीत शिरून बिबट्याने महिलेला उचलले, लचके तोडून संपवले; भयंकर अंतामुळे खळबळ

| Updated on: Mar 14, 2022 | 4:44 PM

नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत बिबट्याने सहा जणांवर हल्ले केले आहेत. त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर यापूर्वी पिंपळगाव, मोर, खेड, काळुस्ते या गावातही बिबट्याने हल्ला केल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

Nashik | झोपडीत शिरून बिबट्याने महिलेला उचलले, लचके तोडून संपवले; भयंकर अंतामुळे खळबळ
नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला आहे.
Follow us on

शैलेश पुरोहित, इगतपुरीः नाशिक (Nashik) जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याचा (leopard) अक्षरशः धुमाकूळ सुरूय. आता इगतपुरी तालुक्यातील चिंचलखैरे गावात आपल्या झोपडीत झोपलेल्या महिलेला बिबट्याने उचलून नेत अक्षरशः तिचे लचके तोडून ठार केल्याचे समोर आले आहे. यामुळे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली असून, आम्ही घरात रहायचे की नाही, असा सवाल नागरिक करत आहेत. नरभक्षक बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी होतेय. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्ह्यात बिबट्याविरुद्ध मानव हा संघर्ष पाहायला मिळतोय. मात्र, आता बिबटे कमालीचे आक्रमक झालेत. शेतकऱ्यांना (Farmers) शेतात जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. आता त्यांनी थेट घरात धडक दिलीय. काही दिवसांपूर्वी अंगणात खेळणाऱ्या एका बाळाला बिबट्याने उचलून पळ काढला होता. मात्र, मुलाच्या आईने निकराचा प्रतिकार केल्याने हे बाळ बचावले. आता तर एका ज्येष्ठ महिलेलाच उचलून नेल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजलीय.

कसा केला हल्ला?

इगतपुरी तालुक्यातील चिंचलखैरेमध्ये शकुंतला अमृता रेरे (वय 55) या राहतात. चिंचलखैरे शिवारात त्यांचे शेत आहे. या मळ्यात सहा शेळ्या आहेत. त्यांची राखण करण्यासाठी शंकुतला या शेतात रहायच्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढलाय. रात्री खूप उकाडा जाणवत असल्याने त्यांनी आपल्या झोपडीचे दार उघडे ठेवले होते. रात्री नऊच्या सुमारास अचानक बिबट्याने झोपडीत प्रवेश केला. शकुंतला यांना तोंडात धरून ओढून नेले. त्यांचा पोट्याच्यावरचे लचके तोडून खाल्ले. सकाळी त्यांचा मृतदेह मिळाला. त्यांच्यामागे दोन मुली व एक मुलगा आहे.

15 लाखांची मदत

शकुंतला यांचा मृतदेह पाहून अनेकांना हा घातपाताचा प्रकार वाटला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हा हा बिबट्याने हल्ला केल्याचे समोर आले. त्यामुळे पंचक्रोशीत खळबळ उडालीय. बिबट्याने शेळ्यांना सोडले अन् महिलेलाच भक्ष्य केले. त्यामुळे  परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अशी मागणी होतेय. दरम्यान, शकुंतला यांच्या वारसांना 15 लाखांची मदत करणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांनी दिलीय.

8 महिन्यांत 6 हल्ले; 2 बळी

इगतपुरी परिसरात गेल्या आठ महिन्यांत बिबट्याने सहा जणांवर हल्ले केले आहेत. त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर यापूर्वी पिंपळगाव, मोर, खेड, काळुस्ते या गावातही बिबट्याने हल्ला केल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. बिबट्यासारखा हिंस्त्र प्राणी वारंवार गाव आणि शहराकडे धाव घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. मानवाने प्राण्यांचा अधिवास बळकावला. जंगलांची अक्षरशः कत्तल केली. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. निसर्गाला ओरबाडने थांबवले नाही, तर यापेक्षा भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञ देत आहेत.

इतर बातम्याः

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?