कार्याध्यक्ष पदाबाबत छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य, महाविकास आघाडी कधीपर्यन्त टिकेल? भुजबळ म्हणाले…

| Updated on: May 09, 2023 | 1:00 PM

डीआरडीओच्या संदर्भात दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईनंतर राष्ट्रवादी पक्षाने मोठी मागणी केली होती. त्यावर भुजबळ यांनी उलट प्रतिक्रिया दिली आहे.

कार्याध्यक्ष पदाबाबत छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य, महाविकास आघाडी कधीपर्यन्त टिकेल? भुजबळ म्हणाले...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाच्या संदर्भात राज्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांनी यावर भाष्य केल्यानं चर्चेला बळ मिळाले आहे. अशातच कार्याध्यक्ष पदाबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. याशिवाय छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकेल याबाबतच समीकरण देखील सांगितला आहे. पुण्यातील डीआरडीओ शास्त्रज्ञप्रकरणी आरएसएस वर केल्या जाणाऱ्या आरोपाच्या संदर्भात स्वतःच्याच पक्षाने घेतलेल्या भूमिकेच्या संदर्भात छगन भुजबळ यांनी स्पष्ट सुनावलं आहे. इतकंच काय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आरोपावर भुजबळांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या व्यक्तव्यानंतर कार्याध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरू असतांना छगन भुजबळ म्हणाले, मी असं काही ऐकलं नाही, कार्याध्यक्ष असं काही पद निर्माण होईल का, इथून मुद्दा आहे. आणि निर्माण करणार असतील, तर काय पद्धत असेल, हा दुसरा मुद्दा आहे.

याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये अर्धा डझन लोक तरी असे आहे, की ते कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळू शकतात. त्यात जयंतराव देखील आहे. परंतु आज आमच्या समोर हा मुद्दा नाही असे स्पष्ट सांगत भुजबळ यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

हे सुद्धा वाचा

तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर केलेल्या आरोपावरही भुजबळ म्हणाले, थोडंफार जे आहे, ते एका पक्षाचे दुसऱ्या पक्षाच्या विरोधात सुरू असतं. पण तीन वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र आल्यानंतर थोडं घर्षण होतं. नेत्यांनी जर असं काही म्हटलं, तर एकजुटीत विस्कळीतपणा निर्माण होईल. ते होता कामा नये असेही मत व्यक्त केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण राहिलेले आहे. पंधरा वर्ष राज्य करत असलेलं राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेसचे सरकार त्यांच्या काळात गेलं. मला असं वाटतं की, या सगळ्यांनी आपल्या अंतर्मनात शोध घेतला पाहिजे की, हे असं कसं झालं?

निदान आता परत एकदा जर बांधणी होत असेल, तर अशा पद्धतीचे वक्तव्य होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे असे म्हणत छगन भुजबळ यांनी 2014 ला गेलेल्या सरकारचा ठपका ठेवत एकसंघ राहण्याचा सल्ला दिला आहे.

जोपर्यंत काँग्रेसचे सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे जोपर्यंत एकत्र आहे. तोपर्यंत बाकीचे कुणी काहीही बोलले तरी मला असं वाटतं की, तिकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. मला असं म्हणायचं आहे की, आपल्या नेत्यांनी जे ठरवलं आहे, त्यानुसार खालच्या लोकांना काम करायचं आहे. त्यामुळे मिठाचे खडे टाकू नये असा टोलाही भुजबळ यांनी लगावला आहे.

डीआरडीओ शास्त्रज्ञ प्रकरणी असं आहे की, बाकी काही जरी असलं, तरी आरएसएस संघटनेवर कुणी देशद्रोहाचा आरोप करू शकत नाही, करता कामा नये. परंतु आरएसएस मध्ये आहे असं सांगून जर कुणी असे धंदे करत असेल, तर आरएसएसने त्यांच्यावर नजर ठेवली पाहिजे. पोलीस आणि तपास यंत्रणेने अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

राष्ट्राला धोका देणारे कुठल्याही पक्षाचे असतील, त्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.