नाशकात दुसरा बिबट्याही पकडला

| Updated on: Sep 06, 2021 | 2:04 PM

नाशिक (nashik) जिल्ह्यातल्या इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या दुसऱ्या बिबट्यालाही (Leopard) जेरबंद करण्यात यश आले आहे. शनिवारी मध्यरात्री वनविभागाने (Nashik Forest) लावलेल्या सापळ्यात हा बिबट्या अलगद अडकला. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

नाशकात दुसरा बिबट्याही पकडला
नाशिकमध्ये दुसरा बिबट्या पकडला.
Follow us on

नाशिकः नाशिक (nashik) जिल्ह्यातल्या इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या दुसऱ्या बिबट्यालाही (Leopard) जेरबंद करण्यात यश आले आहे. शनिवारी मध्यरात्री वनविभागाने (Nashik Forest) लावलेल्या सापळ्यात हा बिबट्या अलगद अडकला. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. (Another leopard caught in Nashik, action of forest department)

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात दोन बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू होता. त्यापैकी एका बिबट्यासाठी बेलगाव कुऱ्हे येथील एका पोल्ट्री शेडजवळ मंगळवारी सायंकाळी वनविभागानं पिंजरा लावला होता. पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजूला सावज म्हणून एक शेळी बांधली होती. शिकारीच्या शोधात निघालेला बिबट्या पहाटे चारच्या सुमारास या पिंजऱ्यात अडकला. पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने लोखंडी जाळ्यांना धडका दिल्या. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. चवताळलेल्या बिबट्याने डरकाळ्यांनी परिसर दणाणून सोडला. त्याला पाहण्यासाठी सकाळपासूनच परिसरातल्या नागरिकांची तोबा गर्दी जमली. अखेर भुलीचे इंजेक्शन देऊन या आक्रमक झालेल्या बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले होते. पिंजरा रेस्क्यू व्हॅनला लावून वनविभागाचे अधिकारी त्याला घेऊन गेले. मात्र, त्याच रात्री नांदूरवैद्य येथे एका शेतकऱ्याच्या घराजवळच्या गोठ्यातील पाळीव श्वानावर हल्ला करून दुसऱ्याच बिबट्याने त्याचा फडशा पाडल्याचे समोर आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती होती. आता शनिवारी रात्री दुसरा बिबट्याही वनविभागाच्या सापळ्यात अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

शेतकरी वैतागले

बेलगाव कुऱ्हे पंचक्रोशीत गेल्या वर्षीही बिबट्याचा वावर होता. त्याने अनेक गायी, म्हशी, वासरे, श्वान आदी पाळीव प्राण्यांचा फडशा पाडून शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले होते. शेवटी नागरिकांच्या मागणीनंतर वनविभागानं एका पोल्ट्री शेडजवळ पिंजरा लावला. त्यावेळेही या जाळ्यात बिबट्या अलगद अडकला होता.

हिंस्त्र प्राणी गाव आणि शहराकडे

बिबट्यासारखा हिंस्त्र प्राणी वारंवार गाव आणि शहराकडे धाव घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. मानवाने प्राण्यांचा अधिवास बळकावला. जंगलांची अक्षरशः कत्तल केली. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्जन्य चक्रात प्रचंड बदल झाले आहेत. एकाचवेळी अतिवृष्टी आणि एकाचवेळी दुष्काळाचा अनुभव आपण घेत आहोत. निसर्गाला ओरबाडने मानवाने थांबवले नाही, तर यापेक्षा भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञ देत आहेत. (Another leopard caught in Nashik, action of forest department)

इतर बातम्याः

नाशिकमध्ये महिनाभरात 9 दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू, गुरुवारपासून कडक हेल्मेट सक्ती

नाशिकमध्ये गॅसच्या स्फोटात स्वयंपाकी ठार

नाशिकरोडला दारणाचे पाणी, कळवणला सौरऊर्जेवर पाणीपुरवठा