मरणानेही छळले होते! नाशिक जिल्ह्यात स्मशानभूमी नसल्याने ताडपत्री धरून तरुणावर अंत्यसंस्कार

| Updated on: Sep 27, 2021 | 11:28 AM

नाशिक जिल्ह्यातल्या पिळुकपाडा येथे गावात स्मशानभूमी नसल्याने एका तरुणावर चक्क भर पावसात ताडपत्री धरून अंत्यसंस्कार करणायची वेळ नातेवाईकांवर आली.

मरणानेही छळले होते! नाशिक जिल्ह्यात स्मशानभूमी नसल्याने ताडपत्री धरून तरुणावर अंत्यसंस्कार
नाशिक जिल्ह्यातल्या पिळुकपाडा येथे गावात स्मशानभूमी नसल्याने एका तरुणावर चक्क भर पावसात ताडपत्री धरून अंत्यसंस्कार करणायची वेळ नातेवाईकांवर आली.
Follow us on

नाशिकः अनेकदा जगणं असं छळतं, की एखाद्या व्यक्तीची मरणानं सुटका केली असं म्हटलं जातं. इथं मात्र मरणानंतरही छळणं सुरूच असून, नाशिक जिल्ह्यातल्या पिळुकपाडा येथे गावात स्मशानभूमी नसल्याने एका तरुणावर चक्क भर पावसात ताडपत्री धरून अंत्यसंस्कार करणायची वेळ नातेवाईकांवर आली. या घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो सुद्धा काळीज हेलावून टाकणारा आहे. (As there is no cemetery in Nashik district, cremation was held with tarpaulin)

सुरगाणा तालुक्यात माळवाडी ही समूह ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायती अंतर्गत पिळुकपाडासह सालभोये, पारचा पाडा, पाथर्डी, भरडमाळ, मालेगाव, केळुणे ही गावं, छोटे-छोटे पाडेच येतात. या गावातल्या बहुतांश ठिकाणी स्मशानभूमी नाहीत. त्यामुळं गावात एखादी व्यक्ती मृत झाली की, पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना प्रचंड हाल होतात. पिळुकपाड्यातही तसंच झालं. गावातल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. दुसरीकडे धो-धो पाऊस सुरू होता. त्यामुळं गावकऱ्यांनी सरणावर ताडपत्री धरून अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. सरण पेटवलं गेलं. आगीनं पेट घेतल्यानंतर नाइलाजानं ताडपत्री काढावी लागली. मात्र, पावसाच्या पाण्यानं सरणाची लाकडं ओली झाली. सरण पुन्हा पेट घेता घेईना. यामुळं गावकऱ्यांना तसंच अर्ध जळलेलं प्रेत ठेवून पाऊस बंद होण्याची वाट पाहावी लागली. अखेर किती तरी वेळांनी पाऊस बंद झाला. त्यानंतर पु्न्हा एकदा सरण रचून अर्धवट जळालेल्या प्रेतावर अंत्यसंस्कार करायची पाळी गावकऱ्यांवर आली. मृतदेहाच्या या परवडीनं गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

परिसरात एकही स्मशानभूमी नाही

माळेगाव ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायती अंतर्गत लहान-लहान सात गावं येतात. मात्र, यातील एकाही गावामध्ये स्मशानभूमी नाही. दरवर्षी पावसाळात्यात अंत्यसंस्कार करताना मृतदेहाचे असेच प्रचंड हाल होतात. परिसरातील गावकऱ्यांनी कित्येकदा स्थानिक प्रशासनाला गावात कमीत कमी एक स्मशानभूमी उभारावी, अशी मागणी केली. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्याच धुंदीत असलेले प्रशासन आणि राजकीय नेत्यांना इकडे लक्ष द्यायला वेळ नाही. निवडणुका असला की, पक्षाचे कार्यकर्ते आमच्या गावात येतात. मात्र, आता का नाही, असा सवाल इथले नागरिक करत आहेत. (As there is no cemetery in Nashik district, cremation was held with tarpaulin)

इतर बातम्याः

नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळीः’हस्ता’चे आजपासून ‘गुलाबी’ धुमशान; नाशिकला यलो, जळगावला रेड अलर्ट

यूपीतील कथित धर्मांतर प्रकरणी ATS ची कारवाई, नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला नाशकात अटक