नाशिक कोर्टाने शिक्षा सुनावताच बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आम्ही काही मौजमजा…

ज्यांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही अशा लोकांचा निधी आयुक्त खर्च करत नाहीत म्हणून आंदोलन केलं. त्यामुळे मला शिक्षा सुनावण्यात आली. उलट आंदोलन करण्याची वेळ का आली? आम्ही जाणून बुजून आंदोलन केलं?

नाशिक कोर्टाने शिक्षा सुनावताच बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आम्ही काही मौजमजा...
bacchu kadu
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 08, 2023 | 2:21 PM

चैतन्य मनिषा अशोक, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. दिव्यांगांच्या मागण्याकरीता केलेल्या आंदोलनावेळी महापालिका आयुक्तांवर हात उगारल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र, बच्चू कडू यांना वरच्या कोर्टात अपिल करेपर्यंत जामीनही मंजूर करण्यात आल्याने बच्चू कडू यांनी दिलासा मिळाला आहे. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी काही मौजमजा म्हणून आंदोलन केलं नाही. उलट आयुक्तांनी प्रश्नांची दखल का घेतली नाही? याची विचारणा करून कारवाई होणं अपेक्षित होतं, असं बच्चू कडू म्हणाले.

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही नाशिकमध्ये दोन आंदोलने केली. तीन तीन वर्ष पालिका आयुक्त दिव्यांगांचा निधी खर्च करत नव्हते. त्यामुळे आम्हाला आंदोलन करावं लागलं. मला फोन केल्यानंतर मी आयुक्तांना दोन पत्रं लिहिली. आमदाराच्या पत्रालाही उत्तर आलं नाही. सामान्य माणसाचा अधिकार तर गेला खड्ड्यात पण माझ्या पत्रालाही उत्तर आलं नाही. सगळी ऐशी की तैशी आयुक्तांनी केली. त्यामुळे कंटाळून आम्ही इथे आलो. मौजमजा म्हणून आलो नव्हतो, असं बच्चू कडू म्हणाले.

आंदोलनाची वेळच का आली?

ज्यांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही अशा लोकांचा निधी आयुक्त खर्च करत नाहीत म्हणून आंदोलन केलं. त्यामुळे मला शिक्षा सुनावण्यात आली. उलट आंदोलन करण्याची वेळ का आली? आम्ही जाणून बुजून आंदोलन केलं? कारण नसताना केलं? पत्र दिल्यावरही आंदोलन करण्याची वेळ का आली? हे का तपासलं जात नाही? त्या अधिकाऱ्याची बढती होते अन् आम्हाला शिक्षा सुनावली जाते. हा कसला न्याय आहे? अरे सरकारी कामात अडथळा काय आला? तुम्ही दखल घेतली असती तर ती वेळच आली नसती, असंही त्यांनी सांगितलं.

कलमांचा गैरवापर

353 कलमाचा गैरवापर होत आहे. 353 कलमात दुरुस्ती करण्याची काय गरज होती?, असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.

जामीन मंजूर

दरम्यान, बच्चू कडू यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. बच्चू कडू यांना वरच्या कोर्टात अपिल करेपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. 2017मध्ये बच्चू कडू यांनी नाशिक महापालिकेवर दिव्यांगांचा मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर बच्चू कडू आयुक्तांना पत्र देण्यासाठी गेले. तिथे त्यांची आयुक्तांबरोरब शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतर प्रकरण हमरीतुमरीवर आलं. बच्चू कडू आयुक्तांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे आयुक्तांच्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करत दोघांनाही बाजूला सारलं होतं. त्यानंतर या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us