अमित शहा यांनी ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवल्यानेच युती झाली; अखेर भास्कर जाधव यांनी सुनावलंच
पंतप्रधानांची नक्कल केली की केस दाखल होते. सध्या आमच्यावर फक्त केसेस सुरू आहेत. 75000 रोजगार दिले हे काय खरं असेल असं मानायचे कारण नाही.
चैतन्य गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक: शिवसेना-भाजपच्या युतीवरून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 2019 साली उद्घव ठाकरे युती करण्यासाठी भाजपच्या दारी गेले नव्हते. अमित शहा यांनी अनेक आश्वासने देऊन स्वतःहून युती करून घेतली. त्यांनी उद्धव साहेबांच्या घराचे उंबरठे झिजवून युती करायला भाग पाडलं, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी भाजपला सुनावलं आहे.
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची राजकीय युती झाल्यानंतर नाशिकमध्ये पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपवर शरसंधान साधलं. तुम्ही सगळे लोक माझ्यापेक्षा खूप कडक आहात. आपल्या सर्वांचं राजकीय ध्येय शिवसेनेच्या साथीने पूर्ण व्हावं ही इच्छा आहे, असं भास्कर जाधव म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार हा देश चालवायचा आहे. गेली सात आठ वर्ष या देशात असे निर्णय घेतले जात आहे की, सर्व स्वायत्त संस्था अबाधित राहणार का? अशी भीती निर्माण होत आहे. या सत्ताधारी पक्षाला वाटत आहे की, आमच्याशी दोन हात करायला या देशात कुणीही नाही. पण या देशातील संविधान आम्ही मोडीत काढू देणार नाही, असं त्यांनी ठणकावलं.
2024 साली या देशातील सर्व छोटे मोठे घटक एकत्र होतील. या देशातील अनागोंदी विरोधात सर्व एकत्र होत आहे, त्यातच आता संभाजी ब्रिगेड देखील एकत्र आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यपद्धतीत काही फरक आहे असं मला वाटत नाही. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की ज्याने कधीही जातपात बघितली नाही, असं त्यांनी सांगितलं.
तुम्ही देखील (संभाजी ब्रिगेड) शिवरायांचा भगवा ध्वज घेऊन जात आहात. त्यामुळे तुमचं आमचं जमायला काही हरकत नाही. उद्धव साहेब तुम्हाला (संभाजी ब्रिगेड) लवकर सोडतील, असं मला वाटत नाही, असं ते म्हणाले.
पंतप्रधानांची नक्कल केली की केस दाखल होते. सध्या आमच्यावर फक्त केसेस सुरू आहेत. 75000 रोजगार दिले हे काय खरं असेल असं मानायचे कारण नाही, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी सावरकरांच्या मुद्द्यावरून जाधव यांनी संभाजी ब्रिगेडच्या एका पदाधिकाऱ्याला स्टेजवरच झापलं. तुम्ही सावरकरांवर काढलेले उद्गार चुकीचे आहेत. मोठी माणसं त्यांच्या जागेवर मोठी आहेत. सावरकर यांच्याबद्दल आंबेडकरांचे काय विचार होते, ते असतील. पण तुम्ही असं बोलू नये.
सावरकर जरी ब्राह्मण असले तरी त्यांनी दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे. तुमची आणि आमची युती असली तरी काही गोष्टींचे भान ठेवायला हवे. एका मंचावर आल्यावर काही गोष्टींचं भान ठेवायला हवं, अशा कानपिचक्याही त्यांनी दिल्या.