Nashik rain: पुन्हा भयपूर, परतीचा पाऊस तडाखा देणार!

| Updated on: Oct 11, 2021 | 6:45 PM

नाशिकसह 12 जिल्ह्यात पुढील दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषतः कोकणात पावसाची जोरधार अधिक असणार आहे.

Nashik rain: पुन्हा भयपूर, परतीचा पाऊस तडाखा देणार!
नाशिकमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Follow us on

नाशिकः नाशिकसह 12 जिल्ह्यात पुढील दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषतः कोकणात पावसाची जोरधार अधिक असणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे द्राक्षबागा, कांदा, सोयाबीनचा चिखल झाला आहे. त्यातच आज सोमवारपासून राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या काळात पुढील दोन दिवसांसाठी नाशिक, अहमदनगर, पुणे, ठाणे, मुंबई, पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबईचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसलीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मात्र, मध्य व दक्षिण भारतात मान्सून आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळपास 25 ऑक्टोबर नंतर पावसाळी वातावरण हटण्याचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याकडे यंदा सुरुवातीच्या काळात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे धरणे तळाला गेली. शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले. मात्र, सप्टेंबर महिन्यात लावलेल्या जोरदार हजेरीने त्याने सारी कसर भरून काढली. मनमाड, नांदगाव परिसरात दोन दोनदा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली. यंदा नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला. या पावसाने जिल्ह्यातील गंगापूर धरण समूह भरला आहे.

वीजेचे तांडव सुरू

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून वीजेचे तांडव सुरू आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी पाऊस होत आहे. शनिवारी दुपारीही शिरवाडे वणी परिसरात वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यात विभा गुरव या शेतात काम करत होत्या. यावेळी अचानक वीज कोसळल्याने विभा यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी त्र्यंबक तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडली. त्यात पहिल्या घटनेत चंद्राची मेट येथे रामू रामचंद्र चंद्रे हे तरुण शेतकरी (वय 38) रानात गुरे चारत होते. दुपारी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील सामुंडी येथे एका झाडावर वीज कोसळली. या झाडाजवळच्या घरातील रंजना वसंत लोमटे (वय 45) व त्यांच्या तीन मुली व मुलगा यांना वीजेचा जबर झटका बसला. त्यात रंजना थोडावेळ बेशुद्ध पडल्या. तर त्यांची नऊ वर्षांची मुलगी छायाला रुग्णालयात दाखल करावे लागले. तिची एक बाजू पूर्णतः बधीर झाली आहे, तर इतर दोन मुली अपेक्षा (वय 14) आणि अक्षरा (वय 11) यांच्या हाताला झटका पडून बेशुद्ध पडले. मात्र, त्यांची प्रकृती ठीक आहे. तिसऱ्या घटनेत अंबई माळरानावर वीज पडली. या घटनेत येथे चरणाऱ्या दहा शेळ्या जागीच ठार झाल्या. सुनील भुतांबरे यांच्या या शेळ्या होत्या.

धरणे ओसंडली

नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरले आहे. गंगापूर धरण समूहात गंगापूर (मोठे), काश्यपी (मध्यम), गौतमी गौदावरी (मध्यम) आणि आळंदी (मध्यम) ही चार धरणे आहेत. यातील सारीच धरणे भरली आहेत. त्यामुळे यंदा नाशिककरांची पाणी चिंता मिटली आहे. दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण भरले आहे. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचाही पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला.

इतर बातम्याः

Wife’s murder: टीव्ही बघणाऱ्या बायकोचा डोक्यात मुसळ घालून खून; नाशिकमधल्या घटनेत आरोपीला जन्मठेप

गुन्हेगारांची सुरस कथाः पठ्ठे ऐटबाज रहायचे, चारचाकीतून यायचे अन् मंगळसूत्र चोरायचे; गुजरातची टोळी नाशिकमध्ये चतुर्भुज