मान्सून महाराष्ट्राच्या वेशीबाहेर, तरीही नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाज; म्हणे 19 तारखेलाही झोडपणार

| Updated on: Oct 13, 2021 | 3:58 PM

मान्सून महाराष्ट्राच्या वेशीबाहेर जावूनही नाशिक जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मान्सून महाराष्ट्राच्या वेशीबाहेर, तरीही नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाज; म्हणे 19 तारखेलाही झोडपणार
नाशिकमध्ये दुपारपासून पाऊस सुरू आहे.
Follow us on

नाशिकः मान्सून महाराष्ट्राच्या वेशीबाहेर जावूनही नाशिक जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. इतकेच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

राज्यात सोमवारपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. महाराष्ट्रातल्या बहुतांश भागातून त्याने काढता पाय घेतला आहे. मात्र, मध्य व दक्षिण भारतात तो आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळपास 25 ऑक्टोबरनंतर पावसाळी वातावरण हटण्याचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याकडे यंदा सुरुवातीच्या काळात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे धरणे तळाला गेली. शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले. मात्र, सप्टेंबर महिन्यात लावलेल्या जोरदार हजेरीने त्याने सारी कसर भरून काढली. मनमाड, नांदगाव परिसरात दोन दोनदा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली. यंदा नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर चार वेळेस पूर आला.नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरले आहे. गंगापूर धरण समूहात गंगापूर (मोठे), काश्यपी (मध्यम), गौतमी गौदावरी (मध्यम) आणि आळंदी (मध्यम) ही चार धरणे आहेत. यातील सारीच धरणे भरली आहेत. त्यामुळे यंदा नाशिककरांची पाणी चिंता मिटली आहे. दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण भरले आहे. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचाही पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून वीजेचे तांडव सुरू आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी पाऊस होत आहे. शिरवाडे वणी परिसरात वादळी पावसात विभा गुरव या शेतात काम करत होत्या. यावेळी अचानक वीज कोसळल्याने विभा यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी त्र्यंबक तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडली. त्यात पहिल्या घटनेत चंद्राची मेट येथे रामू रामचंद्र चंद्रे हे तरुण शेतकरी (वय 38) रानात गुरे चारत होते. दुपारी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

इतर बातम्याः  

500 रुपयांच्या 291 बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न; नाशिकच्या हायप्रोफाइल टोळीत चक्क महिला डॉक्टर!

परमबीरांच्या बेनामी मालमत्तेच्या सुरस कथा; पुनमियाच्या बनावट उताऱ्याला सरकारी कचेरीतून फुटले पाय, संशयाचे धुके गडद

बनावट दारूचा दुसरा कारखाना उद्धवस्त; नाशिकमध्ये एकूण दीड कोटीचा ऐवज जप्त, सूत्रधार राजकीय पक्षाचा पदाधिकारी