‘या’ तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, जिकडे तिकडे पाणीच पाणी…

जवळपास दीड तास झालेल्या पावसात शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले असून मका, सोयाबीन, टोमॅटो आणि नुकतीच छाटणी झालेल्या पिकाची अक्षरशः दैना झाली आहे.

या तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, जिकडे तिकडे पाणीच पाणी...
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Oct 01, 2022 | 8:58 PM

नाशिक : राज्यातील हवामान विभागाने (IMD) तीन दिवस राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात (Maharashtra) वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला होता. पुण्यात अक्षरशः रस्त्यांवर पाणी तुंबले होते, झाडेही उन्मळून पडल्याने एकाचा मृत्यू झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील वादळी वाऱ्याने कागदपत्रे उडाली होती. हीच दृश्ये पाहून काही तास उलटत नाही तोच राज्यातील जनतेला नाशिकच्या (Nashik) निफाड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाची दृश्ये पाहण्याची वेळी आली आहे. निफाड तालुक्यात असलेल्या नैताळे येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक दुकानामध्ये पाणी शिरले होते, अनेकांचे पिके वाहून गेली आहेत तर द्रकशाबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अवघ्या दीड तासांमध्ये द्राक्ष बागांचं तळ्यात रूपांतर झाले होते. एकूणच दीड तासांत आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

निफाड तालुक्यात झालेला पाऊस हा यंदाच्या हंगामातील सर्वाधिक जलद गतीने झालेला पाऊस मानला जात आहे.

जवळपास दीड तास झालेल्या पावसात शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले असून मका, सोयाबीन, टोमॅटो आणि नुकतीच छाटणी झालेल्या पिकाची अक्षरशः दैना झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात यंदाच्या वर्षी सिन्नर, नाशिक, दिंडोरी, कळवण, नांदगाव, येवला आणि चांदवड या भागात अतिवृष्टी झाल्याने नागरिक हैराण झाले असून शेतकरी मेटाकुटीला आले आहे.

मागे झालेल्या पावसानंतर नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे झाले त्याची मदतही अजून पदरी पडलेली नसल्याने पुन्हा मुसळधार पाऊस पडू लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

एकूणच ही पावसाची परिस्थिती पाहता “ये बाबा आता तरी थांब ना” अशी उद्विग्न प्रतिक्रिया देत असून शेतकाऱ्यांसह शेतमजूरही हवालदिल झाले आहे.

 

Follow Us