काँग्रेसच्या नेत्यावर भाजपचा ‘हात…’; काँग्रेस-भाजपची जुंपली; नेमकं प्रकरण काय..?

| Updated on: Jan 13, 2023 | 11:02 PM

काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांनी भाजपकडे आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली असली तरी नाना पटोले यांनी मात्र ते आपले उमेदवार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

काँग्रेसच्या नेत्यावर भाजपचा हात...; काँग्रेस-भाजपची जुंपली; नेमकं प्रकरण काय..?
Follow us on

नाशिकः पदवीधर मतदार संघाच्या राजकारणावरून राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे, कारण ठरले आहे ते नाशिकच्या राजकीय वर्तुळामुळे सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे यांच्या उमेदवारीवरून आता काँग्रेसमध्येच फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे सुधीर तांबे यांना काँग्रेसमधून उमेदवारी दिली जाते तर दुसरीकडे मात्र सत्यजित तांबे यांनी भाजपकडे पाठिंबा मागत आपली उमेदवारी जाहीर केली आहे.

त्यामुळे तांबे पिता पुत्रावर आता भाजपच्या कोणत्या नेत्याचा हात आहे हे लक्षात यायला आता वेळ लागला नाही. पाठिंब्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी पाठिंबा मागणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले.

त्यानंतर पदवीधर मतदारसंघाच्या राजकारणावरून आता जोरदार हालचाली सुरू झाल्या. तर दुसरीकडे नाना पटोले यांनी या पिता पुत्रांवर काँग्रेसची कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

त्यामुळे आता तांबे पिता पुत्रांचे राजकीय आखाड्यात काय चित्र असणार आहे हे आता थोड्याच दिवसात स्पष्ट होणार आहे.
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले होते. युवानेता म्हणून सत्यजित तांबे यांचे कार्य चांगलेच आहे.

त्यामुळे आता सत्यजित तांबे यांना भाजपचाच पाठिंबा राहणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या होणाऱ्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही आणि मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला असल्याचे नेते सांगत आहे.

तर दुसरीकडे मात्र भाजप पाठिंबा देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे. व्यक्ती म्हणून, युवा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांचे कौतूक केले आहे,

 

तर दुसरीकडे त्यांनी राजकीय निर्णय धोरणाप्रमाणे घ्यावे लागतात असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच काँग्रेसचा गेम केला असल्याची टीका काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.

त्यामुळे काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांनी भाजपकडे आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली असली तरी नाना पटोले यांनी मात्र ते आपले उमेदवार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नाशिकमधील या राजकीय घडामोडीमुळे आता सुधीर तांबे यांनी फसवेगिरी केली असल्याचे स्पषट झाल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. याबाबत आता हायकमांड काय निर्णय घेतात याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे राजकीय नाट्य घडण्याआधीच नाशिकमध्ये मोठं काही तरी घडणार असल्याचे अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांना भाष्य केले होते. तर त्याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचाही त्यांच्यावर डोळा आहे, चांगली माणसं जमा करायची असतात असं जाहीरपणे सांगितले होते.