Sadabhau Khot: आता तुम्ही कुणाची औलाद आहात हे सांगा; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली

| Updated on: May 08, 2022 | 4:25 PM

Sadabhau Khot: कोरोना काळ संपला असला तरी सरकारचा मात्र अद्याप कोरोना संपत नाहीये. सरकारी तिजोरीवर सरकार दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहे.

Sadabhau Khot: आता तुम्ही कुणाची औलाद आहात हे सांगा; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली
कांदा धोरण ठरलं तरच शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळणार आहे.
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिक: रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर घणाघाती हल्ला केला आहे. त्यातही खोत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना अधिक लक्ष्य केलं आहे. पीक विमा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अद्याप मिळाले नाही. शिवसेनेची (shivsena) सत्ता आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यावरील 10 हजाराचे कर्ज भरणार असल्याचं आश्वासन शिवसेनेने दिलं होतं. 10 हजार तर सोडा शेतकऱ्यांची वीज आता सरकार कापली जात आहे. आमची सत्ता आल्यानंतर आम्ही वीज मोफत देऊ असे अजित पवार यांनी सांगितले होते. वीज मोफत नाही दिली तर आम्ही पवार यांचे औलाद मानणार नाही असे दादा म्हणाले होते. मग आता तुम्ही कुणाची औलाद आहात हे पवार साहेबांनी सांगावे, असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सदाभाऊ खोत यांनी जागर शेतकऱ्याचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा अभियान आम्ही सुरू केलं आहे. हे अभियान नाशिकला पोहोचलं होतं. यावेळी त्यांनी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला.

कोरोना काळ संपला असला तरी सरकारचा मात्र अद्याप कोरोना संपत नाहीये. सरकारी तिजोरीवर सरकार दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहे. हा दराडो लपविण्यासाठी सरकार रोज वेगवेगळे विषय काढत आहे, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सरकारने कष्टकरी वर्गाची चेष्टा सुरू केली आहे. दूध, कांदा प्रश्न गंभीर झाला आहे याकडे सरकार लक्ष देत नाहीये. सरकार विरोधात जे बोलेल त्यांना गुन्हे दाखल करण्याचा काम सुरू आहे. सत्तेत असताना तुम्ही तुडवा, गाडा असे शब्द वापरता. तुम्ही काय औरंगजेबचे औलाद आहात का?, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर नाव न घेता केली.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका

10 जूनला आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. काकांच्या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांचा दौरा होत आहे. त्यावर सदाभाऊंनी भाष्य केलं. गावामध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळ्या आडनावाने लोक ओळखले जातात. पवार, देशमुख, पाटील, जाधव अशा नावाने लोक ओळखले जातात. पण काही लोकांना सांगावं लागतं की मी पाटील आहे. मात्र लोकांच्या लक्षात आले की यांची पाटीलकी गेलेली आहे आणि म्हणून ते आता धडपड करत आहेत, असंही ते म्हणाले.

खडसेंचा आदर पण…

राज्यात गोपीनाथ मुंडे असते तर राज्यातील राजकीय स्थिती बदलली असती. महाराष्ट्रातले मुख्यमंत्रिपद बदलले असते, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी केलं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. खडसे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी भाजपच्या माध्यमातून अनेक वर्ष बहुजनांचं नेतृत्व केलं. परंतु अलिकडच्या काळामध्ये ते राष्ट्रवादीमध्ये गेले आणि त्याला आता दिसायला लागलं. ज्येष्ठ नेते म्हणून मी त्यांचा आदर करतो. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु भारतीय जनता पक्ष हा बहुजनांचा पक्ष आहे. तळागाळातल्या जनतेचा पक्ष आहे. तळागाळातील जनतेला आणि कार्यकर्त्यांना मानसन्मान देणारा पक्ष आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.