तर राज्य सरकार अ‍ॅटोमॅटिक कोसळणार; सत्ता संघर्षाच्या निकालापूर्वीच नरहरी झिरवळ यांनी केलेले मोठे दावे काय?

| Updated on: May 11, 2023 | 10:02 AM

राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तर राज्य सरकार अ‍ॅटोमॅटिक कोसळणार; सत्ता संघर्षाच्या निकालापूर्वीच नरहरी झिरवळ यांनी केलेले मोठे दावे काय?
narhari zirwal
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

चैतन्य गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : राज्याच्या सत्ता संघर्षावर अवघ्या काही तासात निकाल येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या पात्र-अपात्रतेवर निकाल येणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे खिळलेल्या असतानाच राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अचानक नॉट रिचेबल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. नरहरी झिरवळ कुठे गेले? अचानक गायब होण्याचं कारण काय? असे सवाल या निमित्ताने सुरू झाले. ही चर्चा सुरू असतानाच तासाभरात झिरवळ मीडियासमोर अवतरले. मी कुठेच गेलो नव्हतो. इथेच आहे. फक्त मोबाईलला रेंज नसल्याने मोबाईल लागत नव्हता, असं झिरवळ यांनी स्पष्ट केलं. हे सांगतानाच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचं भाकीतही नरहरी झिरवळ यांनी केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

माझा निर्णय घटनेला धरून आहे. आजचा निर्णय अपात्रतेचाच आहे. 16 आमदारात एकनाथ शिंदेही आहेत. ते अपात्र झाल्यावर अ‍ॅटोमॅटिक मुख्यमंत्रीपद जातं आणि सरकार कोसळतं. महाविकास आघाडीचा नेता म्हणून मी हे सांगत नाही. संवैधानिक पदावरील व्यक्ती म्हणून सांगत आहे. पण सरकार कोसळेल असं मी म्हणतोय, असं नरहरी झिरवळ यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

तसाच निकाल लागेल

जो निकाल मी त्यावेळी दिला. तो कायदा तपासूनच दिला आहे. घटनेच्या अनुषंगानेच केला आहे. कायद्याचा आधार घेऊनच मी 16 आमदारांना अपात्र केलं. घटना कुठे कुणाच्या इंटरेस्टसाठी किंवा प्रेशरसाठी बदलत नाही. त्यामुळे निकाल मी ज्या पद्धतीने दिला, त्याच पद्धतीने लागेल. सर्वोच्च न्यायालय देवता आहे. कायदे तज्ज्ञ सर्व कायदे तपासूनच निर्णय देतील. हा निर्णय फक्त केवळ राज्यासाठी नाही. तर तो देशासाठी लागू होईल, असं झिरवळ यांनी सांगितलं.

कुणाची बाजू घेत नाही

विधानसभा अध्यक्षांकडे प्रकरण गेलं तरी ते घटनेचा आधार घेऊनच निर्णय घेतील. त्यामुळे आमदार अपात्रच होतील. मी कुणाची बाजू घेऊन सांगत नाही. कुणाची बाजू घेण्याचा प्रश्नच येत नाही. माझा तुमचा असं होत नाही. मी घटनेच्या तरतुदीवर बोलतोय. घटनेत जे म्हटलंय त्याची माहिती मी देत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

थोड्याच वेळात निकाल

दरम्यान, आज 11.30 वाजता सर्वोच्च न्यायालय राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल देणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांचं घटनापीठ हा निकाल देईल. आजचा निकाल ऐतिहासिक असणार आहे. हा निकाल केवळ महाराष्ट्रासाठीच लागू असणार नाहीये. तर संपूर्ण देशाला लागू होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.