सुषमा अंधारे शिंदे गटाच्या आमदाराला भेटणार?, कारण काय?; ठाकरे गटाकडून सुरुंग लावण्याची तयारी?

| Updated on: Nov 27, 2022 | 1:10 PM

एखादं मंत्रीपद देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याची गरज होती. पण तेही भाजपला शक्य झालं नाही. त्यामुळे भाजपमध्ये जुने विरोधात नवे असा संघर्ष आहे.

सुषमा अंधारे शिंदे गटाच्या आमदाराला भेटणार?, कारण काय?; ठाकरे गटाकडून सुरुंग लावण्याची तयारी?
सुषमा अंधारे शिंदे गटाच्या आमदाराला भेटणार?, कारण काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

चैतन्य गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : मी येत्या 16, 17 आणि 19 डिसेंबर रोजी नाशिक, मालेगाव, नांदगावला जाणार आहे. कारण सुहास भाऊ (सुहास कांदे) आहे, दादा भुसे आहेत, या भावांना मी भेटायला येणार आहे. सुहास भाऊला विस्ताराने भेटणार आहे. निश्चित भेटणार आहे. अर्थातच मनमाडच्या सुहासभाऊलाच मी त्यांना भेटणार आहे, असं उपरोधिक विधान ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे. अंधारे यांनी उपरोधिक विधान केलं असलं तरी सुषमा अंधारे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना भेटणार का? अशी चर्चा रंगली आहे. तसेच नाराजांना आपल्या बाजूला वळवण्याची तयारी तर ठाकरे गटाने सुरू केली नाही ना? अशीही चर्चा होऊ लागली आहे.

सुषमा अंधारे या नाशिकमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सुहास कांदे आणि दादा भुसे या शिंदे गटाच्या आमदारांना भेटणार असल्याचं उपरोधिकपणे सांगितलं. सुहास भाऊ नाराज आहेत. औरंगाबादेत संजय भाऊ नाराज आहे. शिंदे गटातील नाराजांची संख्या फार मोठी आहे. या अंतर्गत लाथाळ्या हळूहळू बाहेर येत राहतील, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

कामाख्या देवीला जाताना त्यांच्याच मंत्र्याांनी त्यांच्या आमदारांना रेडे संबोधनं ही त्यांची आतली खदखद आहे. ती बाहेर येत आहे. कारण ज्या लोकांना गुवाहाटीला घेऊन गेले होते, त्या सर्वांना मंत्रीपदाची गाजरं दाखवली होती.

या सर्वांना मंत्रीपदे देणं ना शिंदेंना शक्य आहे ना भाजपला आहे. कारण भाजपची अवस्था तर घरचं झालं थोडं अन् व्याह्यानं धाडलं घोडं अशी झाली आहे, असं त्या म्हणाल्या.

भाजपलाच त्यांच्या मूळच्या लोकांना न्याय देता येत नाही. माधव भंडारी आणि केशव उपाध्ये हे बरीच वर्ष कष्ट घेत आहेत. किरीट सोमय्यांची किती हाल करायचे? त्यांनी कागदपत्रं काढायची. भ्रष्टाचाराची प्रकरणं काढायची. पण त्यांना काहीच दिलं नाही.

एखादं मंत्रीपद देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याची गरज होती. पण तेही भाजपला शक्य झालं नाही. त्यामुळे भाजपमध्ये जुने विरोधात नवे असा संघर्ष आहे, असा दावा त्यांनी केला.

सध्या एकमेकांचे मतदारसंघ ओढण्याचा प्रकार सुरू आहे. भाजप मतदारसंघ ओढत असल्याने या लाथाळ्या बाहेर येतील. अब्दुल सत्तारांचा एक व्हिडिओ बघितला असेल, ते बडबड करत मुख्यमंत्र्यांच्या दालनातून बाहेर आले.

प्रताप सरनाईकचं मुख्यमंत्र्यांवर चिडणं, प्रताप सरनाईक, गीता जैन आणि प्रकाश मेहता यांची एका सभेत खुर्ची देण्यावरून जुंपणं यावरून या सरकारमध्ये अंतर्गत लाथाळ्या आहेत हे स्पष्ट होतं. त्यामुळे 2023मध्ये मध्यावधी लागणार आहेत एवढं नक्की, असंही त्या म्हणाल्या.

माझं भांडण नाही. मी आरोप करत नाही. मी टीका करत नाही. पण एक कुटुंब आहे तर काय केलं? काय नाही केलं? आणि काय चुकलं? हे विचारण्याचा अधिकार बहिणीला असतो. म्हणून मी नक्कीच बहीण म्हणून मी प्रश्न विचारणार आहे. मला अधिकार आहे, असंही त्या म्हणाल्या.