Photo : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला, भूमिपुत्रांचं सिडको घेराव आंदोलन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आज सिडको घेराव आंदोलन करण्यात येत आहे. (Controversy over naming of Navi Mumbai Airport, CIDCO siege Protest)

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याची मागणी होत आहे.

या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आज (24 जून) सिडको घेराव आंदोलन करण्यात येत आहे.

यावेळी मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे

आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईला छावणीचं स्वरुप आलं आहे. नवी मुंबई आणि पनवेल मध्ये 5 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत.

मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे येथून पोलीस नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. तसंच राज्य राखीव दलाच्या 7 तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. जवळपास 500 पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी आंदोलन हाताळण्यासाठी सक्रिय झाले आहेत. पोलीस काल संध्याकाळ पासून प्रकल्पग्रस्त नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरवात करणार आहेत. पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या मुख्य रस्त्यावर गावकऱ्यांना रोखण्यात येणार आहे.

यानुसार आज सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर ठाणे बेलापूर रस्त्याला हलकी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे.

गेल्या 10 जूनला झालेल्या भव्य आणि आदर्श अशा मानवी साखळीने संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष वेधण्याबरोबरच वाहवा मिळवली. निर्धार पक्का दिबासाहेबांचेच नाव पक्का’ ही प्रामाणिक भूमिका घेत आंदोलनाचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. आता रस्त्यावर उतरून सिडकोला घेराव घातला आहे.

दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडकोला घेराव घालण्यात आला आहे. ज्येष्ठ आणि तरुणांची फौज या आंदोलनात महत्वाची भूमिका पार पाडत आहे. तर दुसरीकडे महिलाही मागे राहिल्या नाहीत.

24 जूनला योगायोगाने याच दिवशी वटपौर्णिमा आहे. असे असले तरी भूमिपुत्र सावित्रींनी यंदाची वटपौर्णिमा या आंदोलनात साजरी करण्याचा निर्धार केला आहे.

या लढाईच्या अनुषंगाने आपल्या सौभाग्याला अधिक बळ देण्यासाठी सिडकोच्या दारातच वटपौर्णिमा साजरी करु, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचा नाव मिळेपर्यत या संघर्षात महिलांचाही सहभाग राहणार आहे. तशीही तयारी महिला मंडळाकडून जोरदार सुरु आहे, अशीही माहिती कृती समितीने दिली आहे.