शिंदे गटाचा भुजबळांना धक्का! माजी नगरसेविका वैशाली दाणी यांचा शिंदे गटात प्रवेश

आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅनलच्या दृष्टीने वैशाली दाणी यांनी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

शिंदे गटाचा भुजबळांना धक्का! माजी नगरसेविका वैशाली दाणी यांचा शिंदे गटात प्रवेश
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Nov 30, 2022 | 11:58 AM

नाशिक : आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिंदे गटात म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून इतर पक्षांच्यानेत्यांना गळाला लावले जात आहे. मागील काही महिन्यांपासून नाशिकमध्ये शिंदे गटात मोठे प्रवेश होणार असल्याच्या चर्चा असल्या तरी असे मोठे नावे समोर येत नव्हती. अशातच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माजी नगरसेविका तसेच भुजबळांच्या समता परिषदेच्या अनेक दिवस पदाधिकारी असलेल्या वैशाली दाणी यांचा नुकताच प्रवेश सोहळा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित वैशाली दाणी यांनी मुंबईत प्रवेश केला आहे. नाशिक महानगरप्रमुख बंटी तिदमे आणि जिल्हाप्रमुख ढिकले यांनी हा प्रवेश सोहळा घडवून आणला आहे. दाणी या 2012 ला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तिकीटावर नाशिक महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडणूक गेल्या होत्या. तर अखिल भारतीय समता परिषदेच्या बरीच वर्षे ट्या शहराध्यक्ष राहिल्या आहेत.

वैशाली दाणी या काही काळापासून राजकारणापासून दूर होत्या, आजारपणामुळे त्या बरीच वर्षे पक्षाच्या कुठल्या कार्यकर्मांतही उपस्थित राहत नव्हत्या.

आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅनलच्या दृष्टीने त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

दाणी यांचा कधीकाळी मोठा दांडगा जनसंपर्क होता, कार्यकर्त्यांची मोठी फळी होती, विशेषतः महिला कार्यकर्त्यांची एकजूट ठेवण्यात दाणी यांची कार्यशैली परिचित होती, मात्र गेल्या काही वर्षात त्या राजकारणापासून दूर होत्या.

राजकारणात सक्रिय होण्यासाठी दाणी यांचा प्रवेश महत्वाचा असला तरी पुन्हा नव्याने काम करावे लागणार आहे, शहरात शिंदे गटाला उभारी देण्यासाठी दाणी कामी येतील असा कयास पदाधिकाऱ्यांचा आहे.

ठाकरे गटातील नगरसेवक आणि पदाधिकारी फोडण्यासाठी शिंदे गटाचा प्रयत्न असला तरी फारसे कुणीही इच्छुक दिसत नाही, भाजपमधीलही अनेक जण प्रवेशाच्या पेचात पडले आहे.

एकूणच नाशिकमधील प्रमुख नेत्यांमधील गटबाजी, राज्यस्तरावरील परिस्थिती बघता प्रवेश रेंगाळले आहेत. शिंदे गटातील प्रवेश ही अफवाच ठरल्याची चर्चा आहे.