पोलिसांना गुंगारा देत सरकारच्या नाकावर टिच्चून पडळकरांची बैलगाडा शर्यत पार!

| Updated on: Aug 20, 2021 | 7:47 AM

सरकारच्या आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली आहे. आज सकाळी पहाटे पाच वाजता पडळकर समर्थकांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करुन शासन आणि प्रशासनाला कात्रजचा घाट दाखवला.

पोलिसांना गुंगारा देत सरकारच्या नाकावर टिच्चून पडळकरांची बैलगाडा शर्यत पार!
Follow us on

सांगली :  सरकारच्या आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली आहे. कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होऊ देणार नाही नाही, असा चंग शासन आणि प्रशासानाने बांधला होता. तर काहीही झालं तरी शर्यत पार पडणारच, असा निर्धार पडळकर यांनी बोलून दाखवला होता. अखेर आज सकाळी पहाटे पाच वाजता पडळकर समर्थकांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करुन शासन आणि प्रशासनाला कात्रजचा घाट दाखवला.

पोलिसांचा मोठा फौजफाटा, मात्र पडळकर आणि समर्थकांनी गुंगारा देऊन बैलगाडा शर्यत भरवलीच!

गोपीचंद पडळकर आयोजित बैलगाडा शर्यतीला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सांगलीच्या झरे गावात आणि सगळ्या पंचक्रोशीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे बैलगाडा शर्यत होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र पडळकर समर्थकांनी मोठ्या शिताफीने पोलिसांना आणि प्रशासनाला  गुंगारा दिला आहे.

एका रात्रीत दुसरा ट्रॅक, सकाळी साडे पाच वाजण्याच्या शर्यत पार!

पडळकर यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला शर्यतीसाठी ट्रॅक उभारण्यात आला होता.  मात्र याचा सुगावा लागताच पोलिसांनी ट्रॅक उध्वस्त केला होता. मात्र पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पडळकर समर्थकांनी तिथूनच पाच किमी अंतरावर दुसरा ट्रॅक मध्यरात्रीच्या सुमारास केला आणि सकाळी पाच वाजता ही स्पर्धा पार पडली.

या शर्यतीत पाच ते सहा बैलगाडा चालक आणि मालक सहभागी झाले होते. अजूनही आमदार गोपीचंद पडळकर शर्यतीच्या ठिकाणी पोहोचलेले नाहीत. सकाळी पावणे सातच्या सुमारास ते आपल्या घरातून बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी जायला निघाले. काही वेळातच त्यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

स्पर्धेनंतर पडळकर समर्थकांचा मोठा जल्लोष

गेल्या चार ते पाच दिवसांपासून बैलगाडा शर्यतीच्या आयोजनावरुन मोठं राजकारण रंगलेलं होतं. बंदी असली तरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणारच, अशी आक्रमक भूमिका पडळकर यांनी मांडली होती. तर आम्ही परवानगी देणार नाही, अर्थात शर्यत पार पडणार नाही, अशी भूमिका पोलिस-प्रशासनाने घेतली होती. त्यामुळे शर्यत पार पडणार की नाही, याची राज्यभरात मोठी उत्सुकता होती. अखेर पडळकर समर्थकांनी स्पर्धेचं यशस्वीपणे आयोजन केलेलं आहे. स्पर्धेनंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

“काही शेतकऱ्यांनी, बैलगाडा चालक मालकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली असल्याचं आम्हाला प्रसारमाध्यमांतून कळत आहे. आम्ही आणखी त्या ठिकाणी गेलेलो नाही. झरे गावात मोठा पोलिस फौजफाटा होता. कायदा आणि सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान आम्ही दिला. पण आता आम्हाला काही शेतकऱ्यांनी स्पर्धा पार पाडली आहे, अशी माहिती कळतीय”

तुमच्याच समर्थकांनी ही शर्यत पार पाडली का? असा प्रश्न विचारल्यावर पडळकरांनी दावा खोडून काढत, “बैलगाडा हा कोणताही समर्थक नाही. बैलगाड्याला जात, पात, धर्म, प्रांत काहीही नाही… गोवंश हा वाचवला पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे, अशी आमची साधी भूमिका आहे. जर आपण गोवंश जतन केला नाही, तर येणाऱ्या पिढीला आपल्याला चित्रात बैल दाखवण्याची वेळ येईल”, असं पडळकर म्हणाले.