इंदापूरसाठी पाणी आणणारचं, मी इतरांसारखा शोबाज नाही, दत्तात्रय भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

| Updated on: Sep 04, 2021 | 6:30 PM

उजनी धरणाच्या पाण्यावरून पोळलेल्या राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर साठी पाणी आणणारच असे म्हणताना उजनी धरणाचा उल्लेख टाळला. मात्र, इंदापूर तालुक्यासाठी पुढील शंभर वर्षांचा विचार करून तालुक्याचा विकास करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

इंदापूरसाठी पाणी आणणारचं, मी इतरांसारखा शोबाज नाही, दत्तात्रय भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला
Dattatray Bharne
Follow us on

पुणे: उजनी धरणाच्या पाण्यावरून पोळलेल्या राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरसाठी पाणी आणणारच, असे म्हणताना उजनी धरणाचा उल्लेख टाळला. मात्र,इंदापूर तालुक्यासाठी पुढील शंभर वर्षांचा विचार करून तालुक्याचा विकास करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

उजनी धरणाचे पाणी इंदापूर तालुक्यातील दुष्काळी 22 गावांना देण्याच्या प्रयत्नात असताना राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे काही महिन्यांपूर्वी अडचणीत आले होते. सोलापूर जिल्ह्याचा रोष भरणे यांना सहन करावा लागला होता, याप्रकरणात त्यांचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद जातेय की काय? असा प्रसंगही आला होता. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नावरती आज राष्ट्रवादी युवक मेळाव्यात भाष्य करताना भरणे यांनी उजनी धरणाचा उल्लेख टाळत, एखाद्या धरणाची कोणती साईड सापडती का? कोठून नवीन पाणी मिळते का? असे म्हणत इंदापूर तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी पाणी आणणारचं, अशी ग्वाही दत्तात्रय भरणे यांनी दिली..

पाणी कसं मिळेल यासाठी प्रयत्न करणार

राज्यमंत्री भरणे म्हणाले,” इंदापूरचा हा आमदार, मंत्री पद मिरविण्यासाठी नसून, शोबाजी करण्यासाठी मुंबईला जात नसून माझ्या तालुक्यातील दुष्काळी भागाला तेथील शेतकऱ्यांना पाणी कसे मिळेल यासाठी प्रामाणिकपणाने काम करण्यासाठी मी धडपड करीत आहे. या राहिलेल्या तीन सव्वातीन वर्षात पुढील येणाऱ्या 100 वर्षांचा विचार करून इंदापूर तालुक्याचा विकास करण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिक पणे प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही या तालुक्याला देता येईल,गोरगरिबांना देता येईल यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे असे म्हणताच उपस्थितांनी दाद देत टाळ्यांच्या कडकडात भरणेंच्या या वक्तव्याला साद दिली.

काही माणसं शो बाज

राज्यमंत्री भरणे यांनी यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांच्या वरती भाषणात भरपूर टीका केली. भरणे म्हणाले, “काही माणसे शो बाज आहेत, या माणसांना सध्या काहीच काम नाही, जाती-पातीचे विषारी प्रचार करतील. फक्त स्वार्थासाठी असा प्रचार करतील यांना कोणाच देणंघेणं नाही, अशा मंडळींपासून युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सावध राहिले पाहिजे. अशा लोकांचे मागील वीस वर्षाचे रिपोर्ट पाहिले पाहिजेत, अशा सूचना भरणे यानी कार्यकर्त्यांना करत वीस वर्षात हर्षवर्धन पाटील यांनी कुठे इंदापूरचा विकास केला का? असा सवाल त्यांनी केला.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

महाराष्ट्र राज्य हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री सतत लोकांना गर्दी करू नका,असे आवाहन करतात. इंदापूरमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत घेतलेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कार्यकर्त्याच्या तोंडाला मास्क नसल्याचे स्पष्ट दिसत होते. यावेळी सोशल डिस्टन्स चा फज्जा उडाला असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे सत्ताधिकारी असलेल्या पक्षातील नेते मंडळी जर असे वागत असतील सर्वसामान्यांनी यांच्याकडून काय बोध घ्यावा अशी चर्चा इंदापुरात रंगली होती.

इतर बातम्या:

उत्तर प्रदेशात पुन्हा भाजप, पंजाबमध्ये काँग्रेसला झटका बसण्याची शक्यता; कसा असेल 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कल?

आमदारांचा पराक्रम, भर रेल्वेत चड्डी बनियनवर फिरले, आक्षेप घेताच प्रवाशांसोबतच भिडले

Dattatray Bharane said he bring water for Indapur and slam Harshwardhan Patil