Chandrapur Flood : चंद्रपुरात जीव धोक्यात घालून पुरात उतरला, पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद मिळाला, अद्याप पूरपरिस्थिती कायम

| Updated on: Jul 23, 2022 | 3:10 PM

चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 ठप्प झाला आहे. अंधारी नदीच्या पुरामुळे चिचपल्ली गावाजवळ महमार्गावर पुराचे पाणी आले आहे.

Chandrapur Flood : चंद्रपुरात जीव धोक्यात घालून पुरात उतरला, पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद मिळाला, अद्याप पूरपरिस्थिती कायम
चंद्रपुरात जीव धोक्यात घालून पुरात उतरला
Image Credit source: t v 9
Follow us on

चंद्रपूर : पूरपरिस्थितीशी झुंड देताना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चंद्रपुरात पोलीस सुरक्षेसाठी पुलाजवळ ठेवण्यात आलेत. पुलावरून पाणी जात असताना रस्ता ओलांडू नका, असं आवाहन करत आहेत. पण, काही जण धोका पत्करून पूर ओलांडण्याचा प्रयत्न करतात. अशाच एक पूर ओलांडणाऱ्याला पोलिसांनी चांगलेच बदडले. सांगून सांगून किती सांगायचं, असं पोलिसांचं म्हणण आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग (National Highway) अंधारी नदीच्या (Andheri River) पुरामुळे ठप्प झालाय. या महामार्गावर दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त असताना एका इसमाने पुलावरुन चालत-चालत सहज पूर ओलांडण्याचा प्रयत्न केला. दुसर्‍या टोकावर आल्यावर पोलिसांनी कारण विचारले. उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला दंडुक्याचा प्रसाद दिला. जिल्ह्यात गेले दहा दिवस प्रचंड अतिवृष्टी सुरू आहे. असे जीव धोक्यात घालून पुरातून प्रवास करणे धोकादायक असल्याचे आवाहन (Appeal) सतत केले जात आहे. मात्र तरीही याला न जुमानता नागरिक अकारण पूर ओलांडत आहेत. अंधारी नदीवरील पूल पार करणाऱ्या या इसमाला मात्र पोलिसांनी अद्यल घडवली.

इरई धरणाची सर्व 7 दारे 1 मीटरने उघडली

चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 ठप्प झाला आहे. अंधारी नदीच्या पुरामुळे चिचपल्ली गावाजवळ महमार्गावर पुराचे पाणी आले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हा महाराष्ट्रातून छत्तीसगडला जोडणारा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात सरासरी 35 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 76 मिमी पावसाची नोंद मूल तालुक्यात झाली आहे. महामार्ग ठप्प झाल्याची घटना याच तालुक्यातील आहे. जिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीच्या 65 टक्के पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसाने शहरलगतच्या इरई धरणाची सर्व 7 दारे 1 मीटरने उघडली. शहराला वळसा घालणाऱ्या इरई नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीचा फटका पुन्हा एकदा सखल भागाला बसण्याची शक्यता आहे. प्रशासन-मनपा त्यामुळे अलर्ट मोडवर आहे.

60 हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

चंद्रपुरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. जिल्ह्यात सर्वदूर बरसणाऱ्या पावसाने शेतकरी व नदीकाठच्या वसाहतीत राहणारे नागरिक धास्तावले आहेत. सतत बरसणाऱ्या पावसाने शहरालगतच्या इरई धरणाची 2 दारे 0.25 मीटरने उघडली आहेत. वेधशाळेने पुढील तीन तासात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर हीच परिस्थिती विदर्भातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये असेल असेही भाकीत करण्यात आले आहे. गेले दहा दिवस चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने सुमारे 60 हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर वर्धा-इरई नदीकाठच्या गावांमध्ये या अतिवृष्टीने हाहाकार केला आहे. यातून सावरत असताना काल रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत केले आहे. सर्वच धरणांची स्थिती काठोकाठ भरलेल्या अवस्थेत असताना यातून आता होणारा विसर्ग विनाशकारी ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा