5 लाखांचं जाळं आखलं, त्याला पैसे घ्यायला बोलावलं आणि तिथेच हेरलं, धाराशिवमध्ये मोठी कारवाई

धाराशिवमध्ये एसीबीने मोठी कारवाई केली आहे. एसीबी अधिकाऱ्यांनी 6 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या सहायक नगर रचनाकार मयुर केंद्रे याला रंगेहात अटक केली आहे.

5 लाखांचं जाळं आखलं, त्याला पैसे घ्यायला बोलावलं आणि तिथेच हेरलं, धाराशिवमध्ये मोठी कारवाई
| Edited By: | Updated on: Mar 29, 2023 | 9:13 PM

धाराशिव : नागपूरमध्ये (Nagpur) एका काँग्रेस आमदाराच्या नावाने 1 कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्यानंतर आरोपीला 25 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची बातमी ताजी असताना धाराशिव (Dharashiv) येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिवमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने (ACB) मोठी कारवाई केली आहे. एसीबीने 6 लाखांची मागणी करणाऱ्या सहायक नगर रचनाकार मयुर केंद्रे याला अटक केली आहे. हा अधिकारी दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडला गेलाय. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे गटनेते महेंद्र धीरगुडे यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर एसीबीने याबाबतची मोठी कारवाई केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सहायक नगर रचनाकार मयुर केंद्रे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. 6 लाख मागणी करुन 5 लाख रक्कम देण्याचे ठरले. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये घेताना केंद्रे यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. सिंदफळ शिवारातील 3 एकर शेतजामीन अकृषी करण्यासाठी ही लाच घेण्यात आली आहे. एका शेतकऱ्याने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पुढील कारवाई सुरु आहे. पोलीस अधीक्षक संदीप आटोळे व अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सिद्धराम म्हेत्रे, पोलीस निरीक्षक विकास राठोड यांनी ही कारवाई केली. सापळा पथकात पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, दिनकर उगलमुगले, विशाल डोके,सचिन शेवाळे, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर,अविनाश आचार्य चालक दत्तात्रय करडे यांनी ही कारवाई केली.

लाचलुचपत कारवाईचा म्हेत्रे पॅटर्न

धाराशिव लाचलुचपत विभागाची या मार्च महिन्यातील ही तिसरी मोठी कारवाई आहे. पोलीस उप अधीक्षक सिद्धराम म्हेत्रे हे 10 मार्चला रुजू झाल्यानंतर ही तिसरी मोठी कारवाई आहे. धाराशिव जिल्ह्यात कारवाईचा ‘म्हेत्रे पॅटर्न’ तयार होत आहे. विशेष म्हणजे जे ट्रॅप झाले ते लाखांच्या घरातील मोठे ट्रॅप आहेत.

या महिन्यात तिसरी मोठी कारवाई

दुष्काळग्रस्त अशी धाराशिव जिल्ह्याची ओळख असली तरी लाचखोरीत मात्र लाखो रुपयांची उड्डाणे आहेत.1 लाखांची लाच घेताना सरपंच पती तर 70 हजारांची लाच घेताना पोलीस पाटील जाळ्यात सापडले होते. परंडा तालुक्यातील ढगपिंपरी येथील पोलीस पाटील यांना 70 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. वाळू संदर्भात ही लाच घेतली होती.

पोलीस पाटील हरिदास हावळे यांना लाच घेताना अटक केली होती. परंडा तालुक्यातील रोहकल या गावात तीन जलजीवन योजनेच्या साईडचे प्रत्येकी 50 हजार रुपये प्रमाणे 1 लाख 50 हजार रुपये किंवा सोलरच्या तीन प्लेट आणि त्याचे साहित्य द्या, अशी लाच मागितली. त्यानंतर एसीबी अधिकाऱ्यांनी 1 लाख रुपये घेताना सरपंच पती हनुमंत कोलते यांना अटक केली होती.