घनसावंगीत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्री राजेश टोपेंकडून पाहणी

| Updated on: Sep 02, 2021 | 7:27 PM

जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीपिकांची राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी पाहणी केली.

घनसावंगीत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्री राजेश टोपेंकडून पाहणी
Follow us on

जालना : जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीपिकांची राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी पाहणी केली. शेतीला प्रत्यक्ष भेट देत नुकसानीची पाहणी करुन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करत आहे, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही टोपे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. (Rajesh Topen inspects crops damaged due to heavy rains in Ghansawangi)

या पहाणी प्रसंगी जि. प. चे उपाध्यक्ष महेंद्र पवार, भागवत रक्ताटे, कल्याणराव सपाटे, उत्तमराव पवार बाळासाहेब जाधव, रघुनाथ तौर, तात्यासाहेब चिमणे, नकुल भालेकर, अमरसिंह खरात, सुदामराव मुकणे, ताराचंद देवले, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, तहसीलदार नरेंद्र देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.आर.शिंदे, उप अभियंता निरवळ, गट विकास अधिकारी जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जालना जिल्ह्यात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावात शेतपिकांचे नुकसान झाले असून मूग, कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर ऊस पीक आडवे झाल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. पिकांबरोबरच काही ठिकाणी रस्ते, पुल तसेच जनावरांचेही नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार या अतिवृष्टीमुळे 10 हजार हेक्टरपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे सांगत झालेल्या नुकसानीची माहिती मंत्रीमंडळासमोर ठेऊन नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

ट्रॅक्टरमध्ये बसून मंगरूळ येथील नुकसानाची पाहणी

घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील पाझर तलाव फूटल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. याची पहाणी करण्यासाठी त्या ठिकाणी कुठलेच वाहन जात नसल्याने पालकमंत्री टोपे यांनी चक्क ट्रक्टरमध्ये बसून नुकसानाची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री टोपे यांनी तीर्थपुरी, बानेगाव, बानेगाव फाटा, सौंदलगाव, शेवता, भोगगाव, मंगरूळ आदी ठिकाणी झालेल्या नुकसानाची पाहणी करत शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून नुकसानाची माहिती घेतली.

इतर बातम्या

Aurangabad Weather : औरंगाबादेत पावसाचा जोर ओसरला, ऊन-सावलीचा खेळ, 6 सप्टेंबरनंतर दणक्यात बरसणार

मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजी छत्रपती गुरुवारी राष्ट्रपतींना भेटणार; शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारही

एसटी कामगारांना पगार मिळणार?, अजितदादांनी एसटी महामंडळाला दिले 500 कोटी

(Rajesh Topen inspects crops damaged due to heavy rains in Ghansawangi)