रत्नागिरी : तब्बल तीन वर्षानंतर एसटीच्या तिकीटात भाडेवाढ झालीये. यामुळे मुंबई पुण्याचा प्रवास तब्बल 75 रुपयांनी महागणार आहे. तर कोल्हापूरच्या प्रवासासाठी 30 रुपयांनी महागणार आहे. कोकणातून मुंबईत जाण्यासाठी आता 450 ऐवजी 525 रुपये मोजावे लागणार आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्याअंतर्गत प्रवास 5 रुपयांपासून 40 रुपयांपर्यत महागणार आहे.
एसटी महामंडळाकडून भाडेवाढ लागू
इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर चांगलाच भार पडला आहे. हा भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली आहे. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच 17.17 टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे.
25 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू
25 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू झाली. नव्या निर्णयानुसार तिकीट किमान 5 रूपयाने वाढणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर 5 ते 10रूपयांनी कमी करण्यात आले आहेत.
तिकीट दरात वाढ नेमकी का केली ?
गेल्या 3 वर्षात इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. इंधनाच्या वाढत्या दराचा बोझा झेलत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकिट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.
शिवशाही, शिवनेरी बसला पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नाही
नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच 6 किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ 5 रुपयाच्या पटीत असून 25 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून (25 आणि 26 ऑक्टोबरच्या मध्यरात्री) लागू होणार आहे.
एसटी प्रवास महागला, किमान 5 रुपयांची भाडेवाढ, रात्रीचा प्रवास स्वस्त, नेमका काय बदल झाला ?https://t.co/q7GjgW8ue0#st | @msrtcofficial | @advanilparab | @CMOMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2021
संबंधित बातम्या :
बुलडाण्यात 32 प्रवाशांसह धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला भीषण आग, बस जळून खाक
धक्कादायकः चेकपॉइंटवर तपासणीसाठी बसमध्ये शिरलेल्या कर्मचाऱ्याचेच अपहरण व मारहाण, औरंगाबादमधील घटना