रत्नागिरी रिफायनरीला तीन गावांचा विरोध, ठराव मंजूर; पेच वाढणार?

कोकणातील रिफायनरीच्या नवीन जागेबाबत आता आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. ज्या नवीन जागेत रिफायनरी व्हावी अशी मागणी केली जात आहे, त्यातील तीन गावांनी रिफायनरी विरोधात ठराव मंजूर केले आहेत. ( ratnagiri refinery)

रत्नागिरी रिफायनरीला तीन गावांचा विरोध, ठराव मंजूर; पेच वाढणार?
ratnagiri refinery
| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 2:47 PM

रत्नागिरी: कोकणातील रिफायनरीच्या नवीन जागेबाबत आता आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. ज्या नवीन जागेत रिफायनरी व्हावी अशी मागणी केली जात आहे, त्यातील तीन गावांनी रिफायनरी विरोधात ठराव मंजूर केले आहेत. राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव इथं प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेवर रिफायनरी व्हावी अशी मागणी आहे. या दोन गावांशिवाय देवाचे गोठणे, शिवणे आणि गोवळ या गावांमधील जागा देखील या ठिकाणी रिफायनरीसाठी जाणार आहे. मात्र, या गावांनी रिफायनरीला विरोध केल्याने रत्नागिरीत होऊ घातलेल्या रिफायनरीचा पेच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (three villages opposed ratnagiri refinery project)

पाच पैकी तीन गावांनी फेब्रुवारी 2021 ते जुलै 2021 या कालावधीत रिफायनरीविरोधात ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव केल्याची स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या संपूर्ण घडामोडींमध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. शिवाय उर्वरित दोन अर्थात बारसू आणि गोवळ या ग्रामपंचायतींमध्ये देखील अशाच प्रकारचा ठराव करण्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. नवीन जागेवर रिफायनरी प्रकल्प करत असताना स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. त्यांना प्रकल्प हवा कि नको याचा विचार प्राधान्यानं होईल, असं शिवसेनेकडून स्पष्ट केलं गेलं आहे. त्या पार्श्वभूमिवर या नवीन ठरावांना महत्त्व आलं आहे.

राणेंचाही दावा

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी देखील रिफायनरी होणारच असा दावा केला आहे. त्यामुळे रिफायनरी संबंधातील घडामोडींना महत्त्व प्राप्त झालं आहे. सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागांमधून, ग्रामपंचायतींमधून प्रकल्प व्हावा असा सूर पाहायला मिळत आहे. प्रकल्पाला पाठिंब्याबाबत पत्रं, निवेदनं देखील दिली जात आहे. पण, स्थानिकांना अर्थात ज्यांच्या जमिनी या ठिकाणी जाणार आहेत त्यांना काय वाटतं ही बाब महत्त्वाची आहे. त्याच पार्श्वभूमिवर या ठरावांना महत्त्व प्राप्त झालं आहे.

रिफायनरीवरून वातावरण गरम!

या नव्या जागेमध्ये राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे, गोवळ, शिवणे खुर्द आणि धाऊलवल्ली या गावांमधील सडा अर्थात जमिन जाणार आहे. त्यामुळे सध्या आता याबाबत देखील विरोध होत असल्याचं दिसून येत आहे. याविरोधात 30 जून रोजी बारसु – सोलगांव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेची देखील स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, या साऱ्या घडामोडी घडत असल्या तरी रिफायनरी समर्थकांकडे किंवा त्यांच्या हालचाली आणि भू्मिकांकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही.

कारण, रिफायनरी कोकणात पर्यायानं राजापूर तालुक्यातच व्हावी या समर्थक गट देखील आक्रमक आहे. त्यांच्याकडून देखील याबाबत शक्तीप्रदर्शन केलं जाणार हे निश्चित. शिवाय, सध्या रिफायनरी व्हावी अशा लोकांची संख्या वाढत आहे, असा दावा किंवा चर्चा देखील राजापूर तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे आता आगामी काळात रिफायनरीवरून कोकणात पुन्हा एकदा वातावरण गरमागरम झालेलं दिसून येऊ शकते. परिणामी याच घडामोडींवर आता रिफायनरीचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

 

संबंधित बातम्या:

कोकणात शिवसेनेला मोठा धक्का; नाणार प्रकल्प समर्थक शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश

रिफायनरी प्रकल्प नाणारऐवजी कोकणातच होणार?; रायगड आणि रत्नागिरीत दोन जागांची पाहणी

कधी नेता, कधी न्यायाधीश, कधी मोठा अधिकारी सांगून फसवणूक; कोण आहे सुकेश चंद्रशेखर?