
पर्यावरण वाचवा, पर्यावरणाबरोबरच निसर्गातील परिसंस्थाही वाचवा असं सांगणारा माणूस गेला… निसर्गप्रेमी, पर्यावरण शास्त्रज्ञ, पद्मभूषण माधव गाडगीळ यांचं काल रात्री अल्पशा आजाराने पुण्यात निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आज दुपारीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माधव गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरणाचा पाठीराखा गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ शिरीष प्रयाग यांच्या हॉस्पिटलमध्ये गाडगीळ यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री 11 वाजता गाडगीळ यांचं निधन झालं असून, त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवणार आहे. गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
माधव गाडगीळ यांच्या निधनानंतर पर्यावरण आणि परिसंस्था संवर्धनासाठी सातत्याने आवाज उठवणारा एक विद्वान मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.डॉ. गाडगीळ यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या ‘ए-१८, स्प्रिंग फ्लॉवर अपार्टमेंट, पंचवटी, पाषाण’ या निवासस्थानी सकाळी ठेवण्यात आले आहे.
माधव गाडगीळ यांच्या निधनानंतर पर्यावरणप्रेमींमध्ये दुःखाचं वातावरण आहे. त्यांचं पर्यावरण क्षेत्रातील योगदान अत्यंत अतुलनीय आहे. डॉ. माधव गाडगीळ यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य निसर्ग आणि पर्यावरणाच्या अभ्यासासाठी समर्पित केले होते. गाडगीळ समितीचा अहवाल फार महत्त्वाचा ठरला. पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी त्यांनी दिलेला ‘गाडगीळ समितीचा अहवाल’ आजही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
केवळ कायदे करून पर्यावरण वाचणार नाही, तर त्यात स्थानिक लोकांचा सहभाग हवा, असा डॉक्टर माधव गाडगीळ यांचा ठाम आग्रह होता. माधव गाडगीळ यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं होतं. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं.