
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. पंकजा मुंडे आज छत्रपती संभाजीनगर येथून लातूरला प्रचारासाठी हेलिकॉप्टरने जाणार होत्या, मात्र उड्डाणापूर्वीच पायलटने हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती दिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. आता याबाबत पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या ते सविस्तर जाणून घेऊयात.
हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, ‘मी सकाळी साडे दहा वाजता निघणार होते. हेलिकॉप्टर विमानतळावरून टेक ऑफ होणार होते. मला कळवण्यात आले मी जे काळ हेलिकॉप्टर वापरत होते त्यामध्ये काही बिघाड आहे. मला कालही तसे वाटले होते हे हेलिकॉप्टर जुने आहे. पण काय बिघाड आहे या टेक्निकल बाबतीत मी गेले नाही. मला दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात येणार असे मला सांगण्यात आले.’
हेलिकॉप्टर प्रवासावर बोलताना काल पंकजा मुंडे यांनी म्हटले होते की, मी जेव्हा हेलिकॉप्टरने प्रवास करत असते तेव्हा माझी आई देव पाण्यात ठेऊन बसते. यावर बोलताना आज पंकजा म्हणाल्या की, देव पाण्यात ठेवते म्हणजे, माझी आई सतत विचारत असते की, लँड झाली का, टेक ऑफ झाली का?. एवढी मोठी दुर्घटना झाल्यामुळे सर्वांचे मने हादरलेले आहेत आणि लोकांच्या मनात एक टेन्शन आहे.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, बारामतीतील विमान अपघातानंतर असंख्य कार्यकर्ते मेसेज करत होते ताई हेलिकॉप्टर विमान वापरू नका. पण हेलिकॉप्टरमध्ये बसायच्या आधीच मला क्लिअर केले होतं की या हेलिकॉप्टर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते बदलावे लागेल. त्यामुळे काही काळजी करण्याचे कारण नाही. कदाचित आज शेवटच्या दोन सभा रद्द होतील.
पंकजा मुंडे यांनी हेलिकॉप्टर लँड होताना भीती वाटते का याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, जेव्हापासून अजितदादांचा अपघात झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले आहे. मी विचार करते की त्यावेळी त्या विमानातील लोकांना काय वाटले असेल? किती भयानक यातना आणि भय अनुभवले असेल. माझा स्वभाव आहे खोलात जाऊन विचार करण्याचा आणि त्या घटनेने आमच्या कुटुंबातील सर्व व्यथित आहेत.