औद्योगिक सांडपाणी प्रकल्प ठप्प; कारखान्यांमधील प्रदूषित पाणी थेट ओढ्यात

| Updated on: Feb 21, 2021 | 2:46 PM

हा प्रकल्प शहरातील उद्योगांसाठी संजीवनी ठरला होता. परंतु गत काही वर्षांपासून या प्रकल्पाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. | factory water

औद्योगिक सांडपाणी प्रकल्प ठप्प; कारखान्यांमधील प्रदूषित पाणी थेट ओढ्यात
इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर असल्याने याठिकाणी अनेक प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. विशेषत: सायझिंग, प्रोसेस यातून कापडावर प्रक्रिया केल्यानंतर बाहेर सोडले जाणारे रसायनमिश्रित सांडपाणी हे एकत्र करुन त्यावर प्रक्रिया करुन ते काळ्या ओढ्यात सोडले जाते.
Follow us on

कोल्हापूर: जलशुद्धीकरण यंत्रणाच बंद असल्याने औद्योगिक सांडपाणी विनाप्रक्रिया थेट काळ्या ओढ्यात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रकल्प (सीईटीपी) यांच्या निष्काळजीपणाबद्दल राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेच तक्रार करणार असल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी दिली. (Polluted factory water directly released into water stains in ichalkaranji)

इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर असल्याने याठिकाणी अनेक प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. विशेषत: सायझिंग, प्रोसेस यातून कापडावर प्रक्रिया केल्यानंतर बाहेर सोडले जाणारे रसायनमिश्रित सांडपाणी हे एकत्र करुन त्यावर प्रक्रिया करुन ते काळ्या ओढ्यात सोडले जाते. जेणेकरुन प्रदुषणाची तीव्रता कमी होण्यासह शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून व नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रकल्प (सीईटीपी) उभारण्यात आला. हा प्रकल्प शहरातील उद्योगांसाठी संजीवनी ठरला होता. परंतु गत काही वर्षांपासून या प्रकल्पाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. त्या तक्रारींच्या अनुषंगाने पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे, आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक शशांक बावचकर, राजू आलासे व अधिकार्‍यांनी सीईटीपीला प्रत्यक्ष भेट देऊन तसेच परिसरातील काळ्या ओढ्याची पाहणी करुन माहिती घेतली.

सीईटीपी येथून बोहरा मार्केट परिसरातून गेलेल्या काळ्या ओढ्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून पाणी जात असल्याचे निदर्शनास आले. त्याची माहिती घेतली असता एका ठिकाणी गटारातून येणारे सांडपाणी तर दुसरीकडे सीईटीपी येथून सोडलेले सांडपाणी निदर्शनास आले. सीईटीपी येथे प्रक्रिया करुन पाणी सोडल्याचे सांगितले जात असले तरी ओढ्यात येणारे पाणी रसायनमिश्रित व काळसर असल्याचे दिसून आले. त्यामुळे ओढ्यात मिसळणार्‍या दोन्ही पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

त्यानंतर सर्वांनी थेट सीईटीपी येथे जाऊन तेथील माहिती जाणून घेतली. त्यावेळी औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणारी यंत्रणाच बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विनाप्रक्रिया सांडपाणी थेट ओढ्यात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस येण्यासह सीईटीपीतील कारभार चव्हाट्यावर आला आहे.

‘नागरिकांच्या आरोग्याशी खेळ नको’

सीईटीपीमधील या निष्काळजीपणाबद्दल आपण खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करणार आहोत. आमदार आवाडे यांच्या दूरदृष्टीमुळे त्या काळात सीईटीपी प्रकल्प नसता तर आज सर्व उद्योग उद्ध्वस्त झाले असते.
परंतु सीईटीपी येथील व्यवस्थापनाकडून नागरिकांच्या आरोग्याशीखेळ केला जात आहे. तो कदापि सहन केला जाणार नाही.

प्रदुषणाची तीव्रता कमी होण्यासह मिळालेल्या संधीच्या माध्यमातून शहरवासीयांना चांगले आरोग्य, पाणी मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आमदार आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली दिलेल्या आश्‍वासनांची निश्‍चितपणे पूर्तता केली जाईल. त्याच उद्देशाने नागरिकांच्या तक्रारीमुळे आपण सीईटीपी व काळा ओढा परिसरास भेट देऊन पाहणी केली आहे. दोषींवर निश्‍चित कारवाई व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही सुर्वे यांनी सांगितले.

(Polluted factory water directly released into water stains in ichalkaranji)