Prakash Ambedkar : आधी महाराष्ट्र बंद केला, आता प्रकाश आंबेडकर यांची सर्वात मोठी मागणी; ट्विटची चर्चा
नीट (NEET) परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपरफुटीमुळे देशभरात तीव्र संताप आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या भविष्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

नीट (NEET EXAM) परीक्षेतील गैरव्यवहरा. पेपर लीक प्रकरणावरून देशभरात सध्या गदारोल आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जीव गमावले, कित्येक हताश झाले. या सर्वांच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर मोठं आंदोलन सुरू असून दिवसेंदिवस त्याचं स्वरूप व्यापक होत चाललं आहे. यासाठी सोनम वांगचूक यांनी महिनाभर उपोषण केलं, आज त्यांनी ते उपोषण सोडलं असलं तरी सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक तसेच आंदोलनकर्ते आक्रमक असून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. तर सरकारने या मुद्यावर चर्चेची तयारी दाखवली असून पेपरफुटीच्या या गंभीर समस्येवर कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र याच सर्वांदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठी मागणी केली आहे. नीट (NEET) रद्द करा! अशीच मागणी त्यांनी थेट केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी X वर ( पूर्वीचं ट्विटर) एक पोस्ट केली असून त्यात नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. नीट रद्द करा. शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा, असं त्यांनी लिहीलं आहे.
ABOLISH NEET!
DECENTRALISE EDUCATION! pic.twitter.com/KGSexFQQ8s
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 24, 2026
दिली होती महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीत जंतरमंतर येथील सीजेपीच्या आंदोलनात झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी काल ( गुरूवार 23 जुलै) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.. या महाराष्ट्र बंदमध्ये विरोधी पक्षांनी देखील सामील व्हावे असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यांच्या या आवहानला काल राज्यातून संमिश्र प्रतिसाद मिळाला.
ॲड. आंबेडकर यांनी NEET परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. . पहिली परीक्षा चुकीच्या पद्धतीने पार पडली असून, फेरपरीक्षेतही अनेक त्रुटी समोर असल्याचा दावा त्यांनी केला. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय असून, सरकारच्या भूमिकेमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे ते याआधी म्हणाले होते. या धोरणाविरोधात देशभर जन आंदोलन उभे राहिले पाहिजे असं त्यांनी बोलून दाखवलं होतं. तर आता आज त्यांनी नीट रद्द करण्याचीच मागणी केली आहे.
पेपरफुटी रोखण्यासाठी आता आणखी कठोर कायदा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
दरम्यान नीटचा पेपर फुटल्याने देशभरात उग्र निदर्शने सुरू असून विद्यार्थ्यांच्या आक्रोशाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. सरकारने आता मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकार आजच्या कॅबिनेटमध्ये पेपरफुटीला आळा घालण्यासाठी आणखी कठोर कायदा करण्यासाठीचं दुरुस्ती विधेयक आणणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज कॅबिनेटची बैठक होणार असून यामध्ये पेपर लीकबाबतचा कायदा आणखी कठोर करण्यासाठी दुरुस्ती विधेयक आणलं जाणार आहे.