Pune Lockdown : पुण्यातील दुकाने पोलिसांकडून बंद करण्यास सुरुवात, व्यापारी संतप्त, फतेचंद रांकांनी दुकान सुरुच ठेवलं

| Updated on: Aug 04, 2021 | 6:41 PM

सरकारच्या निर्णयाविरोधात जात दुकाने संध्याकाळी 7 पर्यंत सुरुच ठेवणार असल्याची भूमिका पुण्यातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आज दुपारी 4 नंतर सुरु असणारी दुकानं पोलिसांकडून बंद करण्यात येत आहेत.

Pune Lockdown : पुण्यातील दुकाने पोलिसांकडून बंद करण्यास सुरुवात, व्यापारी संतप्त, फतेचंद रांकांनी दुकान सुरुच ठेवलं
पुणे व्यापारी वर्ग, फत्तेचंद रांका
Follow us on

पुणे : राज्यातील 22 जिल्ह्या कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आलीय. मुंबई आणि ठाण्यातही व्यापारी वर्गाला मोठा दिलासा देण्यात आलाय. कारण, दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे पुण्यात मात्र दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात दुजाभाव का असा सवाल इथल्या व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. तर सरकारच्या निर्णयाविरोधात जात दुकाने संध्याकाळी 7 पर्यंत सुरुच ठेवणार असल्याची भूमिका पुण्यातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आज दुपारी 4 नंतर सुरु असणारी दुकानं पोलिसांकडून बंद करण्यात येत आहेत. (Police start closing shops of traders in Pune, aggressive role of Fatehchand Ranka)

पुणेसह राज्यातील 11 जिल्ह्यात कोरोनाचे लेवल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यातील दुकाने दुपारी 4 पर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आम्ही संध्याकाळी 7 पर्यंत दुकाने सुरु ठेवणार असा निर्धार इथल्या व्यापाऱ्यांनी केलाय. त्यामुळे दुपारी 4 नंतर सुरु ठेवण्यात आलेली दुकानं पोलिसांनी बंद करण्यास सुरुवात केलीय. मात्र, व्यापारी संघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी मात्र दुकान सुरुच ठेवलं आहे. ते स्वत: दुकानात बसून आहेत. पोलिसांनी रितसर कारवाई करावी, महापालिकेचे आदेश त्यांनी दाखवावे आणि काय तो दंड आकारावा. मात्र, आम्ही दुकानं सुरुच ठेवणार असल्याची भूमिका रांका यांनी घेतली आहे.

पुण्याच्या बाबतीत दुजाभाव का?

राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नव्या नियमानुसार 25 जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारी 8 वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरु ठेवता येतील. तर शनिवारी दुपारी 3 पर्यंत दुकानं सुरु ठेवण्यास मुभा असेल. मात्र रविवारी पूर्णत: बंद असेल. या सर्व नियमांमध्ये पुणे बसत असताना पुण्यासोबत दुजाभाव का? असा सवाल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

पुण्याच्या बाबतीत राजकारण होतंय

राज्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. शिवाय संक्रमणाचा दरही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात आहे. अधिक सक्रीय कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर या जिल्ह्यांच्या समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, निर्बंध हटवण्यावरून राज्य सरकार पुण्याच्या बाबतीत राजकारण करत असल्याचा आरोपही मोहोळ यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

Pune Lockdown | पुणेकरांना दिलासा नाहीच; महापौर नाराज, व्यापारी आक्रमक

दुकानं आणि हॉटेल्स सुरु होतात मग मंदिरं का नाही, श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचा सरकारला सवाल

Police start closing shops of traders in Pune, aggressive role of Fatehchand Ranka