राष्ट्रवादी काँग्रेसने फुंकले पुणे विधानसभेचे रणशिंग, काय म्हणाले अजित पवार

| Updated on: Jan 22, 2023 | 9:28 AM

कसबा व पिंपरी चिंचवड या मतदारसंघात ज्यांची ताकद जास्त त्या पक्षाला इतरांनी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. यामुळे या पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचा भाजपचा मनसुब्यावर पाणी फिरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने फुंकले पुणे विधानसभेचे रणशिंग, काय म्हणाले अजित पवार
अजित पवार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाची (assembly by election)निवडणूक बिनविरोध करावी असा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ही निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar on Election)यांनी शनिवारी यासंदर्भात सुतोवाच केला आहे. कसबा व पिंपरी चिंचवड या मतदारसंघात ज्यांची ताकद जास्त त्या पक्षाला इतरांनी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली आहे. यामुळे या पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचा भाजपचा मनसुब्यावर पाणी फिरणार आहे.

काय म्हणाले अजित पवार

पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले. अजित पवार म्हणाले की. पुणे येथील दोन्ही जागांच्या पोटनिवडणुकीबाबत येत्या सोमवारी किंवा मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत घटक पक्ष तसेच मित्र पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. पिंपरीमधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यांकडेही ही निवडणूक लढवण्याचा आग्रह केला आहे. महाविकास आघाडीने या दोन्ही जागा लढवाव्यात, असे माझे स्पष्ट मत आहे. ज्या ठिकाणी ज्याची ताकद थोडीशी जास्त आहे, तिथे इतर पक्षांनी मनाचा मोठेपणा दाखवून पाठिंबा द्यावा, अशी आपली भूमिका असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले.

हे सुद्धा वाचा

रुपाली ठोंबरे तयारीत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी या निवडणुकीविषयी बोलताना सांगितले की, आम्ही शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याकडे विनंती करणार आहोत की, ही निवडणूक आपण लढली पाहिजे.मला पक्षाने आदेश दिला तर मी नक्की कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढणारच आहे. भाजपला ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे वाटते. परंतु याच भाजपने पंढरपूरमध्ये उमेदवार दिला होता मग त्यावेळी भाजपची राजकीय संस्कृती कुठे गेली होती? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

भाजपकडून कोण?

भाजपकडून कोण निवडणूक लढवणार हे अजून स्पष्ट नाही. परंतु दिवगंत आमदार मुक्ता टिळक यांच्या परिवाराकडून निवडणूक लढवण्याची तयारी आहे. यासंदर्भात शैलेश टिळक म्हणाले की, टिळक परिवारात उमेदवारी मिळावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे. मुक्ता टिळक यांनी अनेक वर्ष या परिसरात चांगलं काम केले आहे. मुक्ता टिळकांचं मतदार संघासाठी काम पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी हीच आमची इच्छा आहे. पण कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील, असेही म्हणाले आहेत.