शरद पवार यांना चेकमेट करण्यासाठी अजित पवार सक्रीय, राज्यस्तरीय अधिवेशन बोलवले

sharad pawar and ajit pawar ncp | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारल्यानंतर अजित पवार यांनी पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रीत केले आहे. आपला गट मजबूत करण्यासाठी त्यांनी आता राज्यस्तरीय अधिवेशन बोलवले आहे. राष्ट्रवादीमधील बंडानंतर हे पहिलेच अधिवेशन होत आहे. या माध्यमातून वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न अजित पवार करणार आहे.

शरद पवार यांना चेकमेट करण्यासाठी अजित पवार सक्रीय, राज्यस्तरीय अधिवेशन बोलवले
Ajit Pawar
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 20, 2023 | 12:38 PM

योगेश बोरसे, पुणे, दि. 20 नोव्हेंबर | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड पुकारले. त्यानंतर अजित पवार राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारसोबत गेले. अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर शरद पवार सक्रीय झाले. त्यांनी राज्याचे दौरे केले. सभा घेतल्या. त्यांना उत्तर देण्यासाठी अजित पवार यांनी उत्तरसभा घेतल्या. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा वाद विधासभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगात सुरु आहे. नवी दिल्लीत निवडणूक आयोगापुढे २० नोव्हेंबरपासून सुनावणी होत आहे. तसेच पक्षावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अजित पवार यांनी मोठी खेळी खेळली आहे. बंडानंतर पहिले अधिवेशन अजित पवार यांनी बोलवले आहे. येत्या 30 आणि 1 तारखेला अजित पवार गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे.

कर्जतला घेणार अधिवेशन

अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यात पक्षाचे अधिवेशन आणि मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जतला दोन दिवसीय अधिवेशन आणि मेळावा 30 आणि 1 तारखेला होणार आहे. या अधिवेशनला राज्यभरातून मराठा समाजातील पदाधिकारी येणार आहे. राज्यातील सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे. अधिवेशनच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असणार आहे. अधिवेशनाला अजित पवार यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे.

अजित पवार दिल्लीला जाणार

अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार नवी दिल्लीत आजपासून निवडणूक आयोगापुढे होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुक आयोगात राष्ट्रवादी नेमकी कुणाची याबाबत सुनावणी आजपासून तीन दिवस होणार आहे. दुसरीकडे शरद पवार देखील दिल्लीत या सुनावणीसाठी दाखल होणार आहे. आजच्या सुनावणीला सुप्रिया सुळेही उपस्थित राहणार आहे. निवडणूक आयोगापुढे यापूर्वी २ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी दोन्ही गटाकडून बाजू मांडण्यात आली होती. शरद पवार गटाने अजित पवार गटाकडून खोटी प्रतिज्ञापत्र देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आता आजपासून सुरु होणाऱ्या सुनावणीत दोन्ही गट काय भूमिक घेणार? याकडे लक्ष लागले आहे.