Bird Flu : बर्ड फ्लूची धास्ती पण सांगलीकरांचा चिकन आणि अंड्यांवर ताव!

| Updated on: Jan 27, 2021 | 8:29 PM

सांगली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून आयोजित महोत्सवात सांगलीकरांनी चिकन आणि अंड्यांवर ताव मारला.

Bird Flu : बर्ड फ्लूची धास्ती पण सांगलीकरांचा चिकन आणि अंड्यांवर ताव!
Follow us on

सांगली : राज्यात अनेक ठिकाणी बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचं निदर्शनास आलं आहे. बर्ड फ्लूमुळे शेकडो कोंबड्या दगावल्याचंही समोर आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पोल्ट्री व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अशावेशी चिकन आणि अंडी खाण्यामुळे बर्ड फ्लूचा फैलाव होत नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून आयोजित महोत्सवात सांगलीकरांनी चिकन आणि अंड्यांवर ताव मारला. नागरिकांमध्ये असणारे गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.(Organizing Chicken Festival in Sangli Zilla Parishad)

राज्यात अनेक जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आहे. नागरिकांमध्ये चिकन आणि अंड्यांबाबत गैरसमज आणि भीती पसरली आहे. राज्य सरकारकडून या काळात चिकन आणि अंड्यांवर कुठल्याही प्रकारचं बंधन घालण्यात आलेलं नाही. असं असलं तरी लोक चिकन आणि अंडी खाणं टाळत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांवर मोठं आर्थिक संकट ओढावलं आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी चिकन महोत्सवाचं आयोजन करण्याचं आलं होतं. जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या या चिकन महोत्सवात चिकन आणि अंड्यांचे अनेक पदार्थ ठेवण्यात आले होते. सांगलीकरांनीही या महोत्सवात सहभागी होत चिकन आणि अंड्यांवर ताव मारल्याचं पाहायला मिळालं.

बर्ड फ्लूमुळे माणसाचा मृत्यू झाल्याचं दाखवा आणि बक्षिस मिळवा

बर्ड फ्लू संबंधी वेगळा फार्स निर्माण झाला तो थांबवला पाहिजे. देशात बर्ड फ्लूमुळे आजवर एकाही माणसाचा मृत्यू झालेला नाही. बर्ड फ्लूने एकाही माणसाचा मृत्यू झाला असेल तर तो शोधून द्या. त्याला मी रोख रक्कम बक्षिस म्हणून देईन, असं पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी म्हटलंय. सध्या राज्यात बर्ड फ्लूमुळे अनेक कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांवर मोठा परिणाम होत आहे. अशावेळी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सुनील केदार यांनी बर्ड फ्लूसंबंधी निर्माण झालेला फार्स थांबवला पाहिजे असं म्हटलंय.

बर्ड फ्लूची लक्षणं काय?

बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव होणं, वा जास्त इन्फेक्शन होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त वा कफचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. ही सगळी लक्षणं सध्याच्या कोरोना विषाणूंच्या लक्षणांशी मिळती-जुळती आहेत, त्यामुळं सध्याच्या काळात हा विषाणू धोकादायक ठरु शकतो

बर्ड फ्लूवर औषध आहे का?

बर्ड फ्लूवर औषध उपलब्ध आहेत. टॅमी फ्लूच्या गोळ्यांद्वारे हा रोग बरा होतो. त्यामुळं बर्ड फ्लू आल्यानंतर सरकार टॅमी फ्लूच्या (tamiflu) गोळ्यांचा साठा करणं सुरु करतं. याशिवाय रेलेन्झा (relenza), रॅपीवॅप (Rapivab) याही गोळ्या डॉक्टरांकडून दिल्या जातात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नये. कारण, टॅमी फ्लूसह इतर गोळ्यांची दुष्परिणामही होऊ शकतात.

संबंधित बातम्या :

Birds Dying in India :कोरोनानंतर बर्ड फ्लूचं संकट?, देशभरात हजारो पक्षांचा मृत्यू, राजस्थानात हायअलर्ट

Bird Flu | आधी कोरोना त्यातच पुन्हा ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव, ‘ही’ लक्षणे दिसताच घ्या वैद्यकीय मदत!

Organizing Chicken Festival in Sangli Zilla Parishad