महाराष्ट्रात लोकशाही नाही, ‘लॉकशाही’ आहे; फडणवीसांचा हल्लाबोल

| Updated on: Apr 12, 2021 | 10:20 AM

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. (devendra fadnavis slams maha vikas aghadi over lockdown)

महाराष्ट्रात लोकशाही नाही, लॉकशाही आहे; फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis
Follow us on

पंढरपूर: देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच उठसूठ लॉकडाऊन केला जात आहे, असं सांगतानाच महाराष्ट्रात लोकशाही नसून लॉकशाही आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. (devendra fadnavis slams maha vikas aghadi over lockdown)

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान औताडे यांचा प्रचार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी प्रचारसभेतून जनतेशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सभा घेण्याची सवय गेली आहे. दुर्देवाने ही पोटनिवडणूक लागली आहे. एका मतदारसंघाची ही पोटनिवडणूक असली तरी सरकारचा नाकर्तेपणा दाखवून देण्याची ही संधी मतदारांना मिळाली आहे, असं सांगतानाच देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहे. सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रात आहे. परंतु, ही परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच लॉकडाऊन केला जात आहे. कष्टकरी, शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज न देता लॉकडाऊन केला जात आहे. पॅकेजशिवाय करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे, असं सांगतानाच राज्यात लोकशाही नसून लॉकशाही आहे, असं फडणवीस म्हणाले.

लबाड सरकार

या सरकारने वीज कापणार नाही असं आश्वासन अधिवेशनाच्या सुरुवातीला दिलं. अधिवेशन सुरू झाल्यानंतर या सरकारने लगेचच वीज तोडणी सुरू केली. एखाद्या गावात पाच लोकांनी वीज बिल भरलं नाही तर त्या गावचा ट्रान्सफार्मर काढला जात असून गावांना अंधारात लोटलं जात आहे. त्यामुळे आज पंढरपूरच्या विकासाचं आश्वासन देणाऱ्या या सरकारला भुलून जाऊ नका. ठाकरे सरकार केवळ लबाड सरकारच नाही तर महावसुली सरकार आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

बिल्डरांना पायघड्या

ठाकरे सरकारने कोरोना कालात बिल्डरांना पाच हजार कोटींची सूट दिली. कारण त्यांना बिल्डरांकडून मालपाणी मिळाले, असं सांगतानाच ठाकरे सरकारचे आवतन म्हणजे लबाडाचे आवतन आहे. ते जेवल्याशिवाय काही खरे नाही. हे महाभाग पंढरपूरसाठी काहीही देणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा, असं आवाहनही त्यांनी केलं.

2 मे रोजी देशाला धक्का बसेल

भगवान बसवेश्वरांच्या स्मारकासाठी या सरकारने अर्थ संकल्पात काहीही तरतूद केली नाही. आम्ही या स्मारकासाठी तरतूद केली होती. त्यांना विचारल्यावर फक्त एकही पैसा कमी पडू देणार नाही, असं हे सरकार सांगत असतं, असं सांगतानाच येत्या 2 मे रोजी पंढरपूरचा निकाल लागेल. त्याच दिवशी बंगाल आणि आसामचाही निकाल लागणार आहे. त्यावेळी देशामध्ये सर्वांनाच धक्का बसेल, असा दावाही त्यांनी केला. (devendra fadnavis slams maha vikas aghadi over lockdown)

 

संबंधित बातम्या:

‘फडणवीसांची सूचना चांगली, पण व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेजसाठी केंद्राने सढळ मदत करावी’

मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग, कोव्हिड सेंटर्ससाठी BMC पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घेणार

LIVE | मिक्स इंडस्ट्रियल हायड्रोकेमीकल ऑईलची चोरी, पोलिसांनी केला 43 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

(devendra fadnavis slams maha vikas aghadi over lockdown)