Weather Update : काळजी घ्या, पुढील तीन दिवस उष्णतेची लाट, राज्यात उष्मघाताचा पहिला बळी

Maharashtra Temperature : राज्यात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. अनेक शहरांचे तापमान ४० अंशांच्या वर गेले आहे. त्यामुळे नागरिकांना उष्मघाताचा त्रास जाणवू लागला आहे. राज्यात उष्मघातामुळे पहिला मृत्यू जळगाव जिल्ह्यात झाला आहे.

Weather Update : काळजी घ्या, पुढील तीन दिवस उष्णतेची लाट, राज्यात उष्मघाताचा पहिला बळी
तापमान वाढ
Jitendra Zavar | Updated on: May 13, 2023 | 8:48 AM

पुणे : पुणे शहरासह राज्यात गेल्या दोन दिवसापासून उष्णतेत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 43 अंशाच्यावर गेलेला आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ याभागात देखील उष्णतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पुढील तीन दिवस पुणे शहरासह राज्यात तापमानात मोठी वाढ होणार असल्याचं पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आल आहे. त्यासोबत पुणे शहराचा पारादेखील पुढील तीन दिवस 42 अंशाच्यावर जाईल, असे देखील पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉक्टर के. एस. होसळेकर यांनी सांगितले आहे. तर पुढील तीन दिवसानंतर उष्णतेत मोठी घट होणार असल्याचा अंदाज पुणे वेध शाळेकडून वर्तवण्यात आला आहे.

जळगावात उष्मघातामुळे मृत्यू

जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरली असून तापमान 45 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व रावेर येथे उष्मघातामुळे मृत्यू झाला आहे. अमळनेर येथील रुपाली राजपूत यांचा तर रावेर येथील नम्रता दिनेश चौधरी यांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला आहे.

कसा झाला त्रास

नम्रता चौधरी वरणगाव येथून धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी येत असताना त्यांना उन्हाचा तडाखा बसला. त्यांना उलट्या व मळमळ झाल्यामुळे त्या घरातच बेशुद्ध पडल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर अमळनेर येथील रुपाली या एका विवाह समारंभासाठी अमरावतीला गेल्या होत्या. प्रवास करुन परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्रास वाढताच त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार करुन घेतले होते. परंतु काही वेळानंतर त्यांना उलट्यांचा जास्तच त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट

राज्यात उन्हाच्या कडाक्यानं नागरिक त्रस्त झाले आहे. पुण्यात तापमान चाळीशीच्या वर गेले आहे. जळगावमध्ये काल सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची झाली नोंद झाली. पुढील तीन दिवस हवामान खात्यानं उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील प्रमुख शहरात तापमानानं उच्चांक गाठलाय .

का आली उष्णतेची लाट

बंगालच्या उपसागरात बदल होत आहे. याठिकाणी मोचा वादळ सक्रीय झाले आहे. त्यामुळे अवकाळी पडणारा पाऊस जाऊन राज्यातील कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 44.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.पुढील 72 तासांत यंदाच्या वर्षातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us