सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस?; आर. आर. आबांच्या लेकाची लक्षवेधी प्रतिक्रिया

Rohit R R Patil on Mahavikas Aghadi and Sangali Loksabha Election 2024 : सांगलीत महाविकास आघाडीत धुसफूस?; रोहित पाटील काय म्हणाले? सांगलीच्या जागेवरचा तेढ कायम आहे? सांगलीच्या स्थानिक राजकारणात नेमकं काय घडतंय? आर. आर. आबांचा लेक काय म्हणाला? वाचा सविस्तर...

सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस?; आर. आर. आबांच्या लेकाची लक्षवेधी प्रतिक्रिया
आयेशा सय्यद | Updated on: Apr 03, 2024 | 3:54 PM

लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. अशात काही जागांवरून महाविकास आघाडीत तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. सांगलीतील जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेच सुरु आहे. ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. पण यामुळे सांगलीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत जात पक्षश्रेष्ठींपुढे आपली नाराजी व्यक्त केली आजही काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे. यावर दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पाटील काय म्हणाले?

महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारची धुसफूस नाही. सांगलीत काँग्रेसची ताकद जास्त आहे. सांगली जागेबाबत आज महाविकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे, असं रोहित पाटील म्हणाले. शिरूरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी रोहित पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये आहेत. तिथे रोहित पाटील माध्यमांशी बोलत होते.

शिरूर लोकसभेत प्रचार करत असताना आम्हाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नागरिकांच्या मनात प्रचंड चीड आहे. पुणे जिल्ह्यातील आमचे दोन्ही खासदार हे संसदरत्न आहेत. इथल्या जनतेसाठी ते भांडले आहेत, असं रोहित पाटील यांनी म्हटलं.

शरद पवारांबाबत रोहित पाटील काय म्हणाले?

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लागलेली आहे. सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवायचं आहे. हे महाराष्ट्रातील नागरिकांनी ठरवलं आहे. सध्याच राजकारण खालच्या पातळीवर गेलेलं आहे. हे तरुणांना आणि जेष्ठ व्यक्तींना मान्य नाही.  महाराष्ट्राच्या जडण-घडणीत शरद पवार यांचं मोठं योगदान आहे. गेली 55- 60 वर्ष ते महाराष्ट्राच्या हितासाठी लढत आहेत. हे नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे. दिल्लीत प्रश्न मांडायचा म्हटला तरी आज महाराष्ट्रात केवळ शरद पवार हाच पर्याय आहे. शरद पवार हे ज्या प्रमाणे ताकद लावून चांगलं काम खेचून आणू शकतात. ती धमक इतर नेत्यांमध्ये नाहीत, असं रोहित पाटील म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us