Pune Ajit Pawar : कदाचित महाराष्ट्र दिन असेल म्हणून सभा आयोजित केली असेल, अजित पवारांनी औरंगाबादमधल्या राज ठाकरेंच्या सभेची हवाच काढली

| Updated on: May 01, 2022 | 9:43 AM

जातीय, धार्मिक सलोखा आपल्याला कायम ठेवायचा आहे. आपल्या वक्तव्यातून तेढ निर्माण होईल, वाद निर्माण होईल, अशी वक्तव्ये टाळावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

Pune Ajit Pawar : कदाचित महाराष्ट्र दिन असेल म्हणून सभा आयोजित केली असेल, अजित पवारांनी औरंगाबादमधल्या राज ठाकरेंच्या सभेची हवाच काढली
पुण्यातील महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी बोलताना अजित पवार
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : आज महाराष्ट्र (Maharashtra Day) दिन आहे. यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे. आपण सुसंस्कृत आहोत. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने काहींनी सभा आयोजित केल्या असतील, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे. शिवाजीनगरच्या पोलीस संचलन मैदानात (Police parade ground) समारंभ त्यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त ध्वजवंदन व संचलन समारंभ पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. सभेविषयी ते म्हणाले, की कोणतीही सभा घेताना पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. औरंगाबादेतल्या सभेला पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत. त्याचे पालन संबंधितांनी करावे. म्हणजे वातावरण चांगले राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

‘तलवारींच्या साठ्याविषयी पोलीस घेत आहेत माहिती’

जातीय, धार्मिक सलोखा आपल्याला कायम ठेवायचा आहे. आपल्या वक्तव्यातून तेढ निर्माण होईल, वाद निर्माण होईल, अशी वक्तव्ये टाळावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. दुसरीकडे तलवारींचा साठा सापडला आहे. त्याची माहिती पोलीस खाते घेत आहे. विद्ध्वंस घडवण्याचा काहींचा प्रयत्न असावा. त्या आत्ताच का सापडत आहेत, त्याचा मास्टरमाइंड कोण, याचा शोध सुरू आहे, असेही ते म्हणाले. पोलीस दल सगळीकडे चोख बंदोबस्त ठेवून आहे. तलवारीचा साठा सापडला त्यावर पोलीस जप्तीची कारवाई करत आहेत, असेही ते म्हणाले.

‘…तर कोरोनाचे निर्बंध लागू शकतात’

महाविकास आघाडी सरकार आल्यावर काही दिवसात कोरोनाचे संकट आले. आपण सर्वांनी शर्थीने या संकटावर मात केली. कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी अजून ते संपले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध जरी हटवले असले तरी सर्वांनी स्वच्छेने मास्क वापरला पाहिजे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. आता कुठेलही निर्बंध नाहीय, मात्र राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढली आणि टास्क फोर्सने सूचना केली तर निर्बंध लागू शकतात, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.

‘बेळगाव महाराष्ट्रात नसल्याची खंत’

बेळगाव अद्याप महाराष्ट्रात येऊ शकले नाही, याची खंत कायम राहणार आहे. मात्र ही गावे जोपर्यंत महाराष्ट्रात येणार नाहीत, तोपर्यंत या गावांना पाठिंबा असणार आहे, असे अजित पवार म्हणाले.