Pune Lal Mahal : रील्स बनवण्याच्या नादात बदनाम होतोय पुण्यातला लाल महाल; तत्काळ गुन्हे दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी एक गाणे त्या ठिकाणी लाल महालात शूट केले आहे. त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

Pune Lal Mahal : रील्स बनवण्याच्या नादात बदनाम होतोय पुण्यातला लाल महाल; तत्काळ गुन्हे दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
लाल महालातील रील्सवर आक्षेप नोंदवताना संतोष शिंदे
Image Credit source: tv9
| Updated on: May 20, 2022 | 5:19 PM

पुणे : लाल महाल (Lal Mahal) पर्यटकांसाठी आहे, की रील्स बनवण्यासाठी असा संतप्त सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगरपालिकेने बंद ठेवला आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ते म्हणाले, की हजारो पर्यटक जिजाऊ-शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. पुणे महानगरपालिका (Pune municipal corporation) आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांकडून लाल महाल बंद ठेवण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे जिजाऊ-शिवरायांच्या लाल महालात रिल्स काढण्याच्या नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुलींना नाचवले जात आहे. जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत. संबंधितांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

‘जिजाऊ-शिवरायांची अस्मिता म्हणजे लाल महाल’

मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी एक गाणे त्या ठिकाणी लाल महालात शूट केले आहे. त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. जिजाऊ-शिवरायांची अस्मिता म्हणजे तो लाल महाल आहे. हजारो शिवप्रेमी लाल महालात जाऊन नतमस्तक होत असतात. त्याच ठिकाणी लाल महाल बंद असताना चित्रपटाची घाणेरडी गाणी चित्रीत करून लाल महाल बदनाम केला जात आहे, असा आरोप संतोष शिंदे यांनी केला आहे.

‘गाणी चित्रित करणे निषेधार्ह’

जिजाऊ-शिवरायांनी सोन्याचा नांगर चालवून हे पुणे वसवले. त्याच जिजाऊंच्या लाल महालामध्ये अशा पद्धतीची गाणी चित्रित करणे हे निषेधार्ह आहे. हा लाल महालाचा अवमान आहे, असे ते म्हणाले. या घाणेरड्या व्हिडिओ संदर्भात दोन-तीन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त तसेच मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. मात्र पोलीस प्रशासन तक्रार दाखल करायला तयार नाही. तरीदेखील आम्ही पाठपुरावा सोडणार नाही. या सर्व लोकांवर तत्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केली आहे.