Rain : राज्यात आता कुठे पडणार सरासरीपेक्षा जास्त पाऊस, हवामान विभागाकडून महत्वाची माहिती

weather update and rain : राज्यात अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठा पुरेसा नाही. आता आयएमडीने महत्वाची माहिती दिली आहे.

Rain : राज्यात आता कुठे पडणार सरासरीपेक्षा जास्त पाऊस, हवामान विभागाकडून महत्वाची माहिती
| Updated on: Jul 13, 2023 | 3:08 PM

पुणे, दिनांक 13 जुलै 2023 : देशभरात मान्सूनचा जोर चांगलाच सुरु आहे. उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे. दिल्लीमध्ये ४० वर्षानंतर विक्रमी पाऊस झाला आहे. दिल्लीतील यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि चंदीगडमध्ये पावसामुळे हाहा:कार माजला आहे. राज्यात पुणे, मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस नाही. काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. आता पुणे हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाकडून १४ ते २७ जुलै दरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार पुढील २ आठवडे महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार आहे. खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

राज्यात अजून मुसळधार नाहीच

राज्यात मान्सून २५ जून रोजी दाखल झाला. परंतु गेली तीन आठवडे पुरेसा पाऊस नाही. यामुळे राज्यातील धरणांमध्ये केवळ २९% पाणीसाठा आहे. पुणे, मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे धरणही पूर्ण भरलेले नाही. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ १७.६६ टक्के जलसाठा झाला आहे. परंतु विदर्भात अजूनही पाऊस नाही. त्यानंतरही नागपूरमधील पाणीसाठा मात्र सर्वाधिक आहे. नागपूरमध्ये ४९ टक्क्यांपर्यंत जलसाठा आहे.

पावसामुळे धबधबे वाहू लागले

मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील धबधबे वाहू लागले आहेत. इगतपुरमधील प्रसिद्ध असलेल्या भावलीतील मुख्य धबधबा पहिल्याच पावसात वाहू लागला आहे. शेकडो मीटर उंची हा धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी होत असते. साताऱ्यातील कास भागात झालेल्या पावसामुळे येथे छोटे मोठे धबधबे कोसळू लागले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात संततधार

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे नंदुरबारमधील सातपुड्याच्या डोंगरांमध्ये असणारे धबधबे प्रावाहीत झाले आहे. तसेच तापी नदीच्या उगम स्थळावर असलेल्या मध्य प्रदेशातही पाऊस सुरु आहे. यामुळे हातनूर धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे.