बोंडेंनी विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत; राजू शेट्टींचा सल्ला

| Updated on: Dec 23, 2020 | 12:47 PM

दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरूच असल्याने त्यावरून भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे.

बोंडेंनी विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत; राजू शेट्टींचा सल्ला
Follow us on

इचलकरंजी: दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरूच असल्याने त्यावरून भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी शेतकरी आंदोलनावर केलेल्या टीकेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पलटवार केला आहे. बोंडे यांनी किमान विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत. मगच बोलावे, असा चिमटा राजू शेट्टी यांनी बोंडेंना काढला आहे. (Raju Shetty slams anil bonde over farmers issue)

‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना राजू शेट्टी यांनी अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. बोंडेंनी आधी विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. मग आमच्यावर बोलावे. दिल्लीच्या आंदोलनामध्ये आतापर्यंत 34 शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. त्याच्यावर बोंडेंनी बोलावं. केंद्र सरकार हुकूमशाही सरकार आहे. त्यांच्या प्रत्येक नेत्यांची डीएनए टेस्ट करायला पाहिजे, असं सांगतानाच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करायला हवेत, यावर बोंडेंनी बोलावे. गेल्या 27 दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यावर तोडगा काढण्याविषयी भाजपच्या नेत्यांनी बोलावे, असं आवाहनही शेट्टी यांनी केलं.

काय म्हणाले होते बोंडे?

राजू शेट्टी हे शरद जोशी यांच्या विचारावर चालत असते तर त्यांनी कृषी कायद्यांना कधी विरोध केलाच नसता. मात्र, आता राजू शेट्टी यांनी हे सर्व विचार गुंडाळून ठेवले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य गुंडाळून ठेवलंय. आता त्यांना केवळ विधानपरिषदेची आमदारकी दिसत आहे. त्यासाठी राजू शेट्टी हे कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. जेणेकरुन आपल्याला महाविकासआघाडीत कुठेतरी स्थान मिळेल. यासाठीच राजू शेट्टींकडून लाळघोटेपणा सुरु असल्याचे बोंडे म्हणाले होते. केवळ शरद पवार यांच्या पायाशी बसण्यासाठी राजू शेट्टी हे कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. त्यांना आता केवळ विधानपरिषदेची आमदारकी दिसत असल्याची जळजळीत टीकाही त्यांनी केली होती.

कृषी कायदे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देणार

नव्या शेतकरी कृषी विधेयकाबाबत शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र, नवीन कृषी कायद्यांमुशे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळेल, शेतमाल नियमन मुक्त केला असल्याने शेतकरी आपला माल कुठेही विकता येत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल, असा दावाही त्यांनी केला होता.

शेतीत उत्पन्न येण्यापूर्वी शेतमालाचा करार कारखानदार, शेती प्रोड्यूसर कंपन्या शेतकऱ्यांशी करतील. बाजारभावाने शेतमालाची खरेदी करतील, असे विधेयक असून या कराराला कायदेशीर पाठबळ मिळाले आहे. कंपन्यांशी करार केला म्हणजे तुमची शेती हडप होईल, हा गैरसमज असल्याचेही ते म्हणाले होते. (Raju Shetty slams anil bonde over farmers issue)

 

संबंधित बातम्या:

‘शरद पवारांच्या पायाजवळ बसण्यासाठी राजू शेट्टींचा कृषी कायद्यांना विरोध’

आंदोलक शेतकऱ्यांचे थेट ब्रिटनच्या खासदारांना पत्र, काय आहे नेमकं कारण?

बच्चू कडूंना मुंबईत येण्यापासून रोखलं, नागपूरमध्ये चार तासांचा ड्रामा; वाचा सविस्तर रिपोर्ट

(Raju Shetty slams anil bonde over farmers issue)