शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या सचिनचा भारतरत्न पुरस्कार काढून घ्या, संभाजी ब्रिगेड आक्रमक

| Updated on: Feb 05, 2021 | 8:57 AM

सचिनने शेतकरी आंदोलनावर केलेल्या ट्विटवरुन त्याचा भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याची मागणी संभाजी बिग्रेडने केलीय.  Sambhaji brigade Attacked Sachin Tendulkar Over Farmer protest

शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या सचिनचा भारतरत्न पुरस्कार काढून घ्या, संभाजी ब्रिगेड आक्रमक
Sachin tendulkar And santosh shinde
Follow us on

पुणे :  माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) शेतकरी आंदोलनावर केलेल्या ट्विटवरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ज्या सचिनच्या खेळावर समस्त देशावासियांनी भरभरुन प्रेम केलं त्याच सचिनने शेतकऱ्यांविरोधात उद्गार काढले, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. अशात सचिनने काढलेल्या उद्गारावर आक्रमक होत संभाजी ब्रिगेडने सचिनचा भारतरत्न (bharatratna) काढून घेण्याची मागणी केलीय. (Sambhaji brigade Attacked Sachin Tendulkar Over Farmer protest)

“सचिन तेंडुलकर नावाचा व्यक्ती शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खूपसून भाजपची सरकारची दलाली करण्यासाठी केंद्राच्या कृषी कायद्याचं समर्थन करतो आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करतो. हा करंटेपणा याच सेलिब्रेटी नावाच्या जातीत दिसून येतो. जर शेतकऱ्याने पेरलंच नाही तर ही सेलिब्रेटी मंडळी काय खाणार आहेत”, असा सवाल करत शेतकरीविरोधी बोलणाऱ्या सचिनचा भारतरत्न काढून घ्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

जर नाही केला पेरा तर काय खाणार धतुरा?

“झोपलेला सचिन 70 ते 71 दिवसांनी  जागा झाला. राज्यसभेत खासदार होता त्यावेळी सभागृहात उपस्थिती लावली नाही. तिथे एक शब्दही काढला नाही आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर हा आता बोलतोय. याला फक्त भाजपची दलाली करायचीय. याच भारताने त्याला भारतरत्न दिला आहे… या बांधावरुन त्या बांधावर शेतकरी रोज हजारो रन्स काढतो. मातीत सोनं पेरुन सोन्यासारखं पीक काढतो. याची कुठे नोंद नाही. सर्वोच्च पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीने शेतकऱ्यांच्या पाठीशी आज खऱ्या खर्थाने उभा राहण्याची गरज असताना मात्र तो अशी शेतकरीविरोधी वक्तव्ये करतोय. त्याचा भारतरत्न काढून घेतला पाहिजे”, अशी आक्रमक भूमिका संभाजी बिग्रडने घेतली आहे. यासंबंधची मागणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.

सचिन तेंडुलकरने ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं…?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत (Farmers Protest) पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिलं. भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले. याच ट्विटवरुन अनेक क्रीडारसिकांच्या रोषाला सचिनला सामोरे जावे लागले.

(Sambhaji brigade Attacked Sachin Tendulkar Over Farmer protest)

हे ही वाचा :

Farmer Protest: भारतासाठी काय चांगलं हे आम्हाला कळतं, बाहेरच्यांनी नाक खुपसू नये: सचिन तेंडुलकर