हिंजवडीत होणार होता साखर कारखाना, पण कसा झाला आयटी पार्क, पवार यांनी सांगितला इतिहास

| Updated on: Mar 05, 2023 | 7:07 AM

बारामतीत शरद पवार यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली. या मुलाखतीत आपल्या जीवनातील अनेक पैलू शरद पवार यांनी उघड केले. शिक्षणापासून क्रिकेटपर्यंतचा जीवन प्रवास सांगितला.

हिंजवडीत होणार होता साखर कारखाना, पण कसा झाला आयटी पार्क, पवार यांनी सांगितला इतिहास
Image Credit source: Google
Follow us on

नविद पठाण, बारामती, पुणे : राजकारण, समाजकारण, शिक्षण अशा सर्वच गोष्टींना स्पर्श करणारी शरद पवार यांची मुलाखत शनिवारी झाली. विद्या प्रतिष्ठानच्या तारांगण युवा महोत्सवात विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवार यांनी आपल्या जीवनातील अनेक पैलू उघड केले. शिक्षणापासून क्रिकेटपर्यंतचा जीवनप्रवास सांगितला. विद्यार्थ्यांना दोन मोलाचे सल्ले दिले. मार्क पाहण्यापेक्षा मेहनत करा, असा संदेश दिला. आपल्या यशाचे रहस्य सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही मुलाखत जीवन जगण्यासाठी पथदर्शक ठरली.

आपले पद प्रतिष्ठा विसरा

शरद पवार यांनी सांगितले की, ज्या क्षेत्रातलं ज्ञान नाही, त्या क्षेत्रातील व्यक्ती लहान असला तरी त्यांच्याकडून माहिती घेण्यात कमीपणा समजू नये. मला संरक्षणमंत्रीपदाची संधी मिळाली. त्यावेळी या क्षेत्राची फारशी माहिती मला नव्हती. यामुळे आधी तिन्ही दलाच्या प्रमुखांकडून मी माहिती घेतली.

हे सुद्धा वाचा

तत्कालीन वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्याकडून माहिती घेतली. मग विमानाने कोल्हापूरला आलो. कोल्हापुरात थोरात नावाचे लष्करी अधिकारी होते. मी थेट त्यांच्या घरी गेलो. दोन दिवस १६-१६ तास त्यांच्याजवळ एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे बसलो अन् सगळं समजून घेतलं. तेव्हा मी मंत्री आणि ते अधिकारी आहेत, असे मी वागलो नाही. नाहीतर मला ज्ञान प्राप्त झाले नसते. तुम्हाला ज्या गोष्टीचं ज्ञान नाही ते मिळवण्यात कमीपणा समजू नका.

हिंजवाडी आयटीपार्क कसे झाले


हिंजवाडी आयटी पार्क करण्याचा इतिहास शरद पवार यांनी उलगडला. ते म्हणाले, मला हिंजवडीत एका साखर कारखान्याच्या भूमीपूजनाला बोलवलं होते. सर्व परिसरातील शेतकरी कार्यक्रमासाठी जमले होते. मी भाषणाला उभा राहिलो. मी स्पष्टच सांगितलं येथे साखर कारखाना होणार नाही.

इथे मला आयटी पार्क सुरु करायचं आहे. त्यात तुम्हालाही भागिदार करणार आहेत. आयटी पार्कमुळे जवळपास २ लाख मुलांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या परवानगीची पुर्तता मी करतो. त्यानंतर हिंजवाडीत साखर कारखान्याऐवजी आयटी पार्क झाला. अन् या आयटीपार्कमध्ये शेतकरीसुद्धा भागिदार आहेत.

राजकारणात यशासाठी

राजकारणात युवकांनी सहभागी व्हावे. फक्त राजकारणातच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी स्वता:ला वाहून घ्या. मग कितीही संकटं आली तरी मागे हटू नका, तुम्हाला यश नक्की मिळेल, असे शरद पवार यांनी सांगितले.

देशातील शेतीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, शेतीवर अवलंबून असणारी संख्या देशात मोठी आहे. पण जमीन वाढली नाही. अनेक प्रकल्पांसाठी शेतजमिनी गेल्या आहेत. एकीकडे शेतजमीन कमी होतेय. परंतु लोकसंख्या वाढतेय. हा फरक कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांना किती टक्के मार्क मिळायचे, विद्यार्थ्यांसमोरच केला खुलासा