अनेक राज्यात भाजपची सत्ता कशी आली?; शरद पवार यांचा भाजपवर निशाणा

मला काळजी एका गोष्टीची आहे की, शीख समाजाचं वेगळं मत आहे. समान नागरी कायद्याला समर्थन करण्याची त्यांची मनस्थिती नाही. त्याबाबत मी माहिती घेतोय, असंही शरद पवार यांनी म्हंटलं.

अनेक राज्यात भाजपची सत्ता कशी आली?; शरद पवार यांचा भाजपवर निशाणा
Govinda Hatwar | Updated on: Jun 29, 2023 | 4:58 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. शरद पवार म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही गोष्टी सांगितल्या. समान नागरी कायद्याबद्दल त्यांनी मत मांडलं. एका देशात दोन वेगवेगळे कायदे कसे असू शकतात ते सांगितलं. मी याबाबत आमच्या पक्षाची भूमिका सांगतो. केंद्र सरकारने निधी आयोगाकडे हा विषय सोपवला. निधी आयोगाकडे या विषयी रस असणारे ९०० प्रस्ताव आलेले आहेत. त्यामध्ये काय म्हटलंय ते माहिती नाही. निधी आयोगासारखी जबाबदार संस्था खोलात जाते, लोकांकडे प्रस्ताव मागते, त्यावर ९०० प्रस्ताव येतात. याचा अर्थ या प्रस्तावातून त्यांची काय सूचना आहे ते पहिल्यांदा द्यायची गरज आहे. समान नागरी कायद्यात शिख, ख्रिश्चन समाज यांच्याबद्दल भूमिका काय ते स्पष्ट करण्याची गरज आहे. मला काळजी एका गोष्टीची आहे की, शीख समाजाचं वेगळं मत आहे. समान नागरी कायद्याला समर्थन करण्याची त्यांची मनस्थिती नाही. त्याबाबत मी माहिती घेतोय, असंही शरद पवार यांनी म्हंटलं.

या मताला दुर्लक्षित करणे किंवा त्याची नोंद न घेणं यावर निर्णय घेणं योग्य होणार नाही. पंतप्रधानांनी या गोष्टींना हात घातला आहे. त्यांनी भूमिका मांडावी. त्यानंतर आमचा पक्ष निर्णय घेईल. देशातील चित्र बघितल्यानंतर लोकांमध्ये असलेली सध्याच्या राजकारण्यांबद्दलची अस्वस्था आणि नाराजी दुसरीकडे विचलित करण्यासाठी प्रयत्न आहे का? अशी शंका आहे, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

आता इथून पुढे एका वर्षात देशाच्या लोकसभेच्या निवडणुका येतील. त्याआधी काही राज्यांच्या निवडणुका आहे. पण कर्नाटक, हिमाचल प्रदेशमध्ये आपण पाहिलं. भाजप पक्ष यांचा लोकमताचा पाठिंबा राज्य पातळीवर काय आहे हे पाहण्याची गरज आहे. त्यामध्ये तुम्ही देशाचा नकाशा तुमच्यासमोर ठेवा. अनेक राज्यांमध्ये भाजपचं राज्य नाही.

गोव्यात भाजपने आमदार फोडले

गोवामध्ये काँग्रेसचं बहुमत होतं. त्यांची सत्ता होती. पण त्यांचे काही आमदार फोडले आणि ते भाजपात गेले. त्यामुळे तिथे सत्ता आली. मध्यप्रदेशमध्ये कमलनाथांच्या नेतृत्वात सरकार होतं. पण तिथले काही आमदार फोडले आणि त्याठिकाणी राज्य आणलं. महाराष्ट्रात काय केलं ते मी वेगळं सांगत नाही.

याचा अर्थ असा आहे, गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम आणि मणिपूर. मणिपूर गेल्या ४५ दिवसांपासून वाईट अवस्था आहे. हे सगळं राज्यांची परिस्थिती हेच सांगतेय की, भाजप ही राज्य सांभाळू शकत नाही. त्यामुळे उद्या निवडणुकांचा निर्णय काय होईल. याची खात्री नसल्यामुळे पंतप्रधानांनी अशोभनीय वक्तव्य केलं, असा आरोपही शरद पवार यांनी केला.

माझी मुलगी तीन वेळा निवडून आली

माझी मुलगी स्वत:च्या कर्तृत्वाने तीनवेळा निवडून आलेली आहे. एखाद्यावेळेला बापदादाची पुण्यायी उपयोगी पडते. पण दुसरी आणि तिसरी निवडणूक आणि त्यानंतर पार्लमेंटच्या परफॉर्मन्समध्ये ९८-९९ टक्के अटेन्डन्स यामध्ये उच्च दर्जाचा क्रमांक आहे. तिला आठवेळा पुरस्कार मिळाला.

पण मोदींनी काहीही सांगितलं तरी स्वत:चं कर्तृत्व असल्याशिवाय जनता वारंवार निवडून देत नाही. त्यामुळे मोदींचं वक्तव्य हे अशोभनीय आहे. संसदेच्या सदस्याबद्दल असं मत व्यक्त करणं योग्य नाही. मी पंतप्रधानांची व्यक्तीगत टीका करत नाही. कारण ती इन्स्टिट्यूशन आहे. त्याबद्दल सन्मान ठेवला पाहिजे. पण इतर राज्यातील अस्वस्थता दिसून येत आहे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

Follow Us