पुण्यातील शरद पवार यांची सभा रद्द, अवकाळी पावसाचा महाविकास आघाडीला फटका

पुण्यात अवकाळी पावसाने लावलेल्या हजरीमुळे महाविकास आघाडीची सभा रद्द करण्यात आली आहे. मविआचे पुण्यातील नेते रवींद्र धंगेकर यांच्यासाठी शरद पवार, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांची सभा होणार होती. तर दुसरीकडे राज ठाकरे- देवेंद्र फडणवीस यांच्या सभेवरही पावसाचं सावट असणार आहे.

पुण्यातील शरद पवार यांची सभा रद्द, अवकाळी पावसाचा महाविकास आघाडीला फटका
sharad pawar
| Updated on: May 10, 2024 | 5:30 PM

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांच्या जंगी सभा होत आहेत. पुण्यामध्ये येत्या 13 तारखेला मतदान होणार आहे. मात्र अवकाळी पावसाने आज लावलेल्या हजेरीने महाविकास आघाडीला याचा फटका बसलाय. पुण्यातील प्रचारसभा पाण्यात गेल्या आहेत. पुण्यामध्ये झालेल्या पावसामुळे शरद पवार यांची पुण्यातील सभा रद्द झाली आहे. शरद पवारांसह ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जालना दौरा रद्द झाला आहे.

पुण्यातील वडगाव शेरीमध्ये रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार, आदित्य ठाकरे आणि  बाळासाहेब थोरात यांच्या सभा होणार होत्या. पण मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पुण्यातील महाविकास आघाडीचे सभा रद्द झाली आहे. पुण्यात ज्या ठिकाणी मविआची सभा होणार होती त्या ठिकाणी पाणी साचलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा जालना दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरेंची संभाजीनगरमधील सभा होण्याबाबत अद्याप संभ्रम आहे.

राज ठाकरे- देवेंद्र फडणवीसांच्या सभेवर सावट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा होणार होती. राज ठाकरेंसह उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचीही सभा होणार होती. मात्र अवकाळी पावसामुळे पुण्यातील महायुतीच्या सभेवरही पावसाचं सावट असणार आहे. पुण्यात जर संध्याकाळीही पावसाने हजेरी लावली तर महाविकास आघाडीसारखी महायुतीसुद्धा प्रचारसभा पाण्यात जाणार आहे.

पुण्यात होणार तिरंगी लढत

दरम्यान, पुण्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. महायुतीकडून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, मविआकडून रविंद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे उभे आहेत. तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील विविध भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे. दुपारी अचानक ढग दाटून आले आणि मेघगर्जेनेसह पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे काही काळ का होईल नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाली आहे.